मुंबई : अयोध्येत राम मंदिराचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमी पूजन होणार आहे. सुमारे पावणे दोनशे लोक त्यासाठी उपस्थित राहणार आहे. यामध्ये १३५ संत-महंतांचा समावेश आहे. भूमीपूजनासाठी अयोध्येत सजावटीसोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेट्स लावले आहेत. भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनुष्ठानाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सहा तासांचं विशेष अनुष्ठान केलं जात आहे. आज सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार असून शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आले आहेत.
मुंबईत शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेने मुंबईतील विविध भागांमध्ये रस्त्यांवर होर्डिंग्ज लावली आहेत. यामध्ये ‘गर्जना साहेबांची, स्वप्नपूर्ती हिंदूंची’ अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. वरळी, दादर, पवईसह विविध ठिकाणी शिवसेनेकडून ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. अयोध्येत बुधवारी होऊ घातलेल्या भूमिपूजन सोहळ्याला देशातील मोजक्याच मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समावेश नाही. त्यामुळे आता शिवसेनेकडून मुंबईत पोस्टरबाजी करुन राममंदिराच्या श्रेयावर दावा केला जात असल्याची चर्चा आहे.
‘प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण’, आडवाणींची पहिली प्रतिक्रिया
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली होती. तसेच राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेतले होते. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्त्वाची कास सोडल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी आपण हिंदुत्त्वाची कास सोडली नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच अयोध्येला जाण्यासाठी आपल्याला कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही. आपण कधीही तिकडे जाऊ शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
‘बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, आज या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते’


