मुंबई : करोनाबाधितांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता २०.५७ टक्क्यांवर पोहोचले असून गेल्या २८ दिवसांमध्ये एकही रुग्ण न आढळलेले जिल्हे १५ झाले आहेत. तर ८० जिल्ह्य़ांमध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये नवा रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशभरात ९.४५ लाख संशयितांना देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे प्रमुख ए. के. सिंह यांनी दिली.
या लोकांमध्ये करोनाची लक्षणे दिसली तर त्यांची तातडीने नमुना चाचणी घेऊन उपचार केले जातील, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यांमधील आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा केली. देशामध्ये समूह संसर्ग झाल्याचे अद्याप तरी आढळलेले नसून करोनाचा तिसरा टप्पा टाळण्यात यश मिळाल्याचे दिसत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,मुंबईत शुक्रवारी खासगी व सरकारी प्रयोगशाळेतील मिळून ३५७ रुग्णांची नोंद झाली. त्यात १६८ रुग्णांचे अहवाल हे खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाले आहेत. हे रुग्ण विविध रुग्णालयांत आधीच उपचार घेत आहेत.
बाधितांचा एकूण आकडा ४५८९ वर गेला असला तरी बरे होऊ न घरी गेलेले रुग्ण आणि मृत पावलेले रुग्ण वगळून सध्या ३८१५ रुग्ण आहेत. तर आणखी ३५९ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी १७९५ रुग्ण हे आधी सापडलेल्या रुग्णांचे निकट संपर्कोतील आहेत.


