मुंबई : अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रितपणे केंद्राकडे पाठपुरावा करू आणि हा प्रश्न मार्गी लावू , अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली. तसेच धनगर समाजाप्रमाणेच अन्य घटकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपले सरकार कटिबध्द असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.
तसेच धनगर आरक्षणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील असे संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर दोनदा गोंधळ झाल्याने काही वेळ सभागृह तहकून करावे लागले. दरम्यान, धनगर आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्ष रखडला आहे. या विषयावर परस्पर मतभेद दूर ठेऊन सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असून, आपण एकत्रितपणे केंद्राकडे जाऊन या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. जे समाज आजही वंचित आहेत त्यांच्या कल्याणासाठी सरकार काम करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
तसेच, धनगर आरक्षणचा प्रश्न संवेदनशील असून, या प्रश्नी येत्या शुक्रवारी स्वतंत्र बैठक घ्यावी, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. तर धनगर समाज आरक्षणासंदर्भात टाटा सामाजिक संस्थेच्या अहवाला संदर्भात येत्या शुक्रवारी महाधिवक्त्यांशी बैठक घेण्यात येईल या बैठकीला मुख्यमंत्री आणि संबंधित विधिमंडळ सदस्यांनी बोलवण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

