पणजी : एकीकडे जाचक नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपविरोधात रोष असल्याचे बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे देशभरात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपचा विजयरथ सुसाट सुटला आहे. भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे
काल जाहीर झालेल्या गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने जबरदस्त कामगिरी करत निर्विवाद विजय मिळवला आहे. गोव्यातील दोन जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ४९ पैकी ३२ जागांवर विजय मिळवला आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष बाब म्हणजे आम आदमी पक्षाने गोव्यात आपले खाते उघडताना एका जागेवर विजय मिळवला.
गोव्यातील ४८ जिल्हा परिषद क्षेत्रात ५० जागा आहेत. मात्र एका ठिकाणी उमेदवाराचे निधन झाल्याने तिथे मतदान झाले नव्हते. जिल्हा परिषदेसाठी १२ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवला. तर सात ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला चार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३ आणि एनसीपी आणि आम आदमी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला.
दरम्यान, गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या निकालांबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ग्रामीण मतदारांनी भाजपाचे नेतृत्व आणि राज्य सरकारवर विश्वास दर्शवला आहे, असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …अन् मंत्री दत्ता मामा भरणे झाले फोटोग्राफर
- गाड्यांवरील नंबर प्लेट संदर्भात मनसे आमदाराकडून ठाकरे सरकारला पत्र पाठवत नाराजी व्यक्त !
- शेतकरी आंदोलन लवकर मागे घेतले नाही तर…,’सीआयआय’ने दिला धोक्याचा इशारा
- ग्रामपंचायत निवडणूक : सायबरसेलची असणार सोशल मिडीयावर करडी नजर
- कापूस खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 19 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ


