उस्मानाबाद : पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या दौऱ्या दरम्यान अनेक ठिकाणी त्यांचा ताफा अडविण्यात आला. आमच्या भागाची पाहणी करा, असा हट्ट धरत शेतकरी पालकमंत्र्यांना बांधावर येऊन पाहणी करण्याची मागणी करत होते. सततच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यात पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील गावकऱ्यांनी दुपारी साडे बाराच्या दरम्यान पालकमंत्री गडाख यांचा ताफा अडवला. घेराव घालत तात्काळ मदत करा, अशी मागणी शेतकरी करत होते. शेतकऱ्यांच्या या हट्टानंतरही पालकमंत्री बांधावर गेलेच नाहीत. त्यानंतर इरला येथील ताफा अडवत आमच्या पडलेल्या घरांना भेटी दिल्याच पाहिजेत, असा हट्ट गावकऱ्यांनी धरला. एकच गलगला करत महिला जोरजोरात पालकमंत्र्यांना आपल्या अडचणी सांगत होत्या. यावेळी पोलीस आणि महिलांमध्ये चांगलीच चकमक झाली. महिलांचा रोष पाहुन पालकमंत्र्यांना या पडलेल्या घरांना भेट द्यावी लागली.
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सून व भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनीही तेरमध्ये पालकमंत्र्यांचा ताफा अडवत त्यांना धारेवर धरलं. आठ दिवसांत मदत करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी पालकमंत्र्यांना दिला. शेतकऱ्यांचा रोष आहे लक्षात घेताच पालकमंत्र्यांनी आपला दौरा आटोपता घेतला. दरम्यान आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे सांगत लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी न करता रस्त्यालगतच्या गावांना भेटी देत पालकमंत्र्यांनी पाहणी आटोपती घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती
- महिला शिल्पकाराचा कमाल…पवारांचा ९ फूट उंच मेटलचा पुतळा साकारला; सुळेंनी केलं कौतुक
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- भुजबळांना भेटलोही नाही; अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणी निकाळजे यांचा दावा
- गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना विचारावं; राणेंनी डिवचलं


