पिंपरी : पाणी व सांडपाणी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील नामांकित ‘डब्ल्युटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या वतीने यावर्षी ‘पर्यावरण वारी’ उपक्रम हाती घेण्यात आला. त्याअंतर्गत वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच, वारीदरम्यान वारक-यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश असलेल्या छत्री, टी-शर्ट वाटपही करण्यात आले.
विशेष म्हणजे, कंपनीतील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांनी उत्साहात वारीमध्ये सहभाग दर्शवला. तसेच, पालखी मार्गावर वारी पुढे गेल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आणि कृतीशील पुढाकार घेणा-या या कंपनीचा आदर्श उद्योगनगरीतील मोठ्या कंपन्यांनी घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान दिघीतील, मॅगझीन चौकात कंपनीच्या वतीने स्वागत मंडप उभारण्यात आला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ‘पर्यावरण वारी’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वारक-यांना उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. डब्लू. टी. ई. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. कंपनीचे संचालक अशोक कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, विनोद भोळे, गुरुप्रसाद तेलकर, दर्शना देशपांडे, प्राजक्ता पाटील, सुभाष धोंडकर, सतीश पाटील, युवराज शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
प्लॅस्टिक बंदीच्या समर्थन
कंपनीच्या कर्मचा-यांनी प्लॉस्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती केली. जनजगृतीचे संदेश असणारे टी-शर्ट परिधान करण्यात आले. तसेच, ‘प्लॅस्टिक हटाव’ असे संदेश असलेले टी-शर्ट वाटप करण्यात आले. मॅग्झीन चौक ते दिघीपर्यंत प्लास्टीकच्या जनजागृतीबाबत रॅली काढण्यात आली.’प्लास्टिक हटवा देश वाचवा’, ‘प्लास्टिक वापरणे सोडा’, ‘पर्यावरणाशी नाते जोडा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाला समर्थन आणि सक्रीय पुढकार दर्शवण्यासाठी कंपनीच्या वतीने प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली, अशी माहिती संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.

संचालक प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, ”पर्यावरणाची आणि नागरिकांच्या आरोग्याची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, कप, प्लेट्स, बाटल्या इत्यादींच्या उत्पादनांवर तसेच वापरावर पूर्णपणे बंदी आणून, महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. वारक-यांच्या मार्फत प्लास्टिकचा वापर करु नये, हा संदेश राज्यातील गावागावात पोहचणार आहे. त्यासाठीच वारीदरम्यान आम्ही जनजागृतीवर भर दिला आहे. प्रतिवर्षी कंपनीच्या वतीने वारक-यांची सेवा केली जाते. गेली दहा वर्षे हा उपक्रम अखंडित सुरु आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

