मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समाजकंटकांनी गुरुवारी(१६ डिसें.) रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Basavraj Bommai) यांनी या घटनेवर केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्याची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार काल कर्नाटक मधील बंगळुरू शहरात घडला.घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास तमाम शिवप्रेमी जनतेचा उद्रेक होईल.तसे झाल्यास त्यास सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहील.’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्याची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार काल कर्नाटक मधील बंगळुरू शहरात घडला.घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास तमाम शिवप्रेमी जनतेचा उद्रेक होईल.तसे झाल्यास त्यास सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहील pic.twitter.com/RnUhHjeeu2
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 18, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांना कठोरात कठोर शासन करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाचे दैवत नसून तर सकल हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमींचे दैवत आहेत. असे असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शासन होणे गरजेचे असून तसे झाले नाही तर त्यांना शिवप्रेमी जनता आपल्या पद्धतीने अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांची विटंबना करण्याचे प्रकार सीमावर्ती भागात घडले आहेत. मात्र आमच्या सहनशीलतेला देखील मर्यादा आहेत’, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- “छत्रपतींसमोर नतमस्तक न होणाऱ्या मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवताय”
- राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादीकडून आज दुग्धाभिषेक
- “मोदींजींनी खरे शिवभक्त असल्याचे संपूर्ण देशाला दाखवून द्यावे, अन्यथा…”


