मुंबई : २ दिवसांपूर्वी किनवट येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरप्रमुख सुनिल ईरावार यांनी टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपवले होते. यामुळे मनसेला धक्का बसला असून स्वतः मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी फोनद्वारे त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करून सांत्वन केले. आता, राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे एक पत्रक जाहीर केले आहे. ज्यातून मनसैनिकांना त्यांनी भावनिक आवाहन केले असून कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. तसेच, एक व्हिडिओ देखील मनसेकडून जारी करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी जाहीर केलेले पत्रक :
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र.
संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.
शेतकऱ्यांच्या दु:खाचे निराकरण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशिल – नाना पटोले
सुनील ईरावर ह्या आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आपल्याला सोडून जाताना लिहिलंय की ‘साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं ह्या पुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा. ‘
अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.
गणेशोत्सव : पुण्यातील मानाचे पाच गणपती मंडपातच होणार विराजमान
मी ह्या आधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो, हा या जातीचा… त्या मतदार संघात अमुक जातीची इतकी मतं आहेत… ह्या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे… असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही, मला माझ्या पक्षाचं राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचं नाही, यश जेंव्हा यायचं असेल तेंव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.
सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, ह्या काळात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.
आपला नम्र,
राज ठाकरे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

