भावना संचेती– लक्ष्मी रस्ता, तुळशी बाग हा पुण्यातील अत्यंत गजबजलेला परिसर आहे. मुख्य बाजापेठ या परिसरात असल्यामुळे गर्दी देखील तितकीच असते. गर्दी जेथे भिकारी तेथे हे जणू समीकरण ठरलेच आहे. अनेक वेळा या भिकाऱ्याना पाहून मनात विचार येतो. हे भिक मागण्यापेक्षा काही काम धंदा का करीत नाहीत ? घाम गाळून पैसे कमवायला काय होत? असे अनेक विचार मनात येतात मात्र मनातील विचार मनातच राहतात.
पुण्यातील शनिपार चौकात फळ विकणाऱ्या सुरेंद्र गाढवे व विक्रम राठोड यांच्या मनात देखील असाच विचार आला आणि त्यांनी तो विचार मनात न ठेवता त्यासाठी प्रयत्न सुरु केले. आणि आज एक वेगळ चित्र उभा राहील आहे.

सुरेंद्र व विक्रम यांनी शनिपार मंदिर व परिसरातील अनेक भिक मागणाऱ्या हाताला काम देत त्यांच्याकडून सुंदर कलाकुती निर्माण करून घेतल्या आहेत. एरवी शनिवारी किवां इतर वेळेस शनिपार मंदिर परिसरातील अनेक भिकारी तासोनतास सिग्नल किवां मंदिरासमोर भिकेसाठी हात पसरून बसलेले असतात. सध्या मात्र हे हात वेगळ्या कामात गुंतले आहेत. दिवाळी सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि हे भिकारी स्वता रंगविलेल्या पणत्यावर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत.
सुरेंद्र व विक्रम यांनी आज अनेक भिकाऱ्यांच्या हातात दिवे देऊन ते रंगविण्याचे काम दिले आहे. याविषयी सुरेंद्र सांगतात मी गेली अनेक वर्ष या परिसरात केळी विकण्याचे काम करतो. या भिकाऱ्याना रोज भिक मागताना पाहतो. तेव्हा नेहमी मनात विचार येतो की यांनी भिक न मागता काही काम करायला हवे. पण हे भिकारी दिसतात तितके साधे नाहीत ते रोज आमच्याशी देखील उभा राहण्यावरून भांडण करीत असतात. यांच्या या भांडखोर स्वभावामुळे त्यानां कोणीही काम देत नाही हे माझ्या लक्षात आले. पण तरीही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती.

या इच्छेतून मी गेल्या वर्षी दिवाळी पासून एक उपक्रम सुरु केला. भिकाऱ्यांना दिवाळीत दिवे रंगविण्याचे काम देण्याचा. सुरवातील एक भिकारी देखील तयार झाला नाही त्यांना काम करण्यापेक्षा भिक मागणे जास्त सोयीस्कर वाटते. मी खूप प्रयत्न केले. त्यांना समजावून सांगितले की रंग आणि पणत्या मी आणून देईल तुम्हाला फक्त त्या पणत्या रंगवायच्या आहेत. विकण्याच काम देखील मीच करेल या बदल्यात मी तुम्हाला चांगला मोबदला देईल. पण एक ही भिकारी तयार झाला नाही.
शेवटी वैतागून मी देखील विचार सोडून दिला. पण एक दिवस अचानक गायकवाड नावाचा भिकारी माझ्याजवळ आला आणि त्यांनी मला काम मागितले. अशा प्रकारे सुरुवात झाली. गायकवाडचे काम पाहून इतर भिकारी देखील येऊ लागले. गेल्या वर्षी ९ भिकाऱ्यानी जवळपास ५०० पणत्या रंगविल्या. मी त्यावर शेवटचा हात मारून बाजारात विकल्या. त्यातून जे पैसे आले ते मी या भिकाऱ्यांना वाटून दिले.
या वर्षी ५ भिकारी पणत्या रंगविण्याचे काम करीत आहेत. रोज सकाळी ७ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत आम्ही हे काम शानिपार मंदिरा जवळ बसून करतो. या कामामध्ये माझा मित्र विक्रम देखील मला मदत करतो. मी आणि विक्रम केळी विकत विकत या पणत्यांना शेवटचा हात मारतो व विकण्यास ठेवतो. यातून मला कोणत्याही प्रकारचा नफा उरत नाही पण भिकाऱ्याच्या हाताला काम दिल्याचे समाधान मात्र मिळते आणि ते माझ्यासाठी पुरेसे आहे हे सांगण्यास सुरेंद्र विसले नाहीत.
भिक मागत अंधारमय जीवन जगण्यापेक्षा मेहनतीने एक दिवा आयुष्यात लावला तरी आयुष्य प्रकाशमय होऊन जात. याच समाधान पुरेस असत
सुरेंद्र गाढवे (फळ विक्रेते)
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

