अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षाचा नगर शहरात वाद पेटला आहे. शहरातील एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणावरून या दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील जुना वाद उफाळून आला आहे.
काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षाने राष्ट्रवादीच्या आमदाराला गुंड म्हटले तर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने काँग्रेसच्या शहराध्यक्षावर खंडणीचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीवर आरोप करण्यामागे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांची फूस असल्याचा आरोपही राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याला झालेली मारहाण राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक यांनी केली आहे, असा आरोप किरण काळे यांनी केला आहे. काळे यांनी जगताप समर्थकांकडून आपल्यालाही धमकावल्याचा आरोप करून पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
संग्राम जगताप यांचा गुंड असा उल्लेख काळे यांनी केला आहे. मात्र, आपण अशा गोष्टींना न घाबरता शिवसेनेचे दिवंगत नेते माजी आमदार अनिल राठोड यांच्या मार्गाने जाऊन अशा दहशतीचा सामना करणार असल्याचा पुनरुच्चारही काळे यांनी केला आहे.
आपल्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जात आहे. नगर शहरात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची घोडदौड रोखण्यासाठी ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचे धमकावल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
काळे यांच्या आरोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काळे केवळ प्रसिद्धीसाठी जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा नगर शहर विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता, काळे हे थोरात व तांबे यांचे समर्थक आहेत.
त्यामुळे जुन्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच थोरात व तांबे यांच्या सांगण्यावरूनच काळे हे आ.जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. त्यामुळे आता नगर शहरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद वाढत जाऊन राज्यपातळीवरील नेत्यांकडे जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- ६ महिन्याने मुख्यमंत्री घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय?
- अकोला रेल्वे स्थानकावर 120 फूट उंच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

