हिंगोली : लोकसभा मतदार संघातील हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देखील दिले आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले हजारो हेक्टरवरील खरीप पिके यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या, तर नदी-नाल्यांनाही मोठ्या प्रमाणावर पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी खासदार पाटील यांनी केली आहे.
यंदा पर्जन्यमान आणि पीकपरिस्थिती चांगली असताना सुद्धा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. यंदाच्या खरीप हंगामातील सप्टेंबर महिना शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक घातक ठरला असून पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने खरिपाच्या सोयाबीन, मूग उडीद, तूर, कापूस, हळद त्याचबरोबर इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक भागातील शेतजमिनी खरडून गेल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले व जनजीवन विस्कळीत झाले होते.
ते म्हणाले की, संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, आणि किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड व महागाव तालुक्याचा दौरा करून अनेक गावांना भेटी देत प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सततच्या नुकसानीने हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांना पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध, दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – जोशी
- सोमठाणा येथील शेतकऱ्यांचा प्रश्न येत्या दहा दिवसात कायमचा मार्गी मार्गी लावणार – सदाभाऊ खोत
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘या’ नियमांचे पालन करणाऱ्या भाविकांनाच तुळजाभवानी मंदिरात प्रवेश दिला जाणार
- ‘रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाचे ‘तारीख पे तारीख’ धोरण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुळावर येत आहे’


