🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून सातत्याने विरोध होत होता. या विरोधाची गंभीर दखल घेत भाजपने सोमय्या यांचा या मतदारसंघातून पत्ता कट केला आहे. आता ईशान्य मुंबईतून भाजप- सेनेचा उमेदवार म्हणून भाजपच्या मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मध्यंतरी शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरु असताना सोमय्या यांनी सेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. पुढे राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सेनेसोबत जुळवून घेतले मात्र सोमय्या यांच्या आरोपांमुळे दुखावलेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांना टोकाचा विरोध केला. अखेर तोंडघशी पडलेल्या सोमय्या यांचं तिकीट कापले गेले. शिवसेना भाजपच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संसदीय समितीनं हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार निधी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी वापरल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. तर अल्प खासदार निधी वापरणाऱ्या खासदार प्रीतम मुंडे या असल्याचे समोर आले होते. भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी सर्वाधिक म्हणजे 100% खासदार निधी वापरल्याचं समोर आलं आहे. सोमय्या यांनी खासदार निधीतले संपूर्ण 25 कोटी रुपये वापरले. तर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी 25 कोटींपैकी फक्त 7.32 कोटी खासदार निधी वापरला.
सर्वाधिक निधी वापरणाऱ्या महाराष्ट्रातील टॉप 5 खासदारांमध्ये भाजपचे चौघे आहेत, तर एक शिवसेनेचा आहे. त्यापैकी दोघे जण मुंबईतील खासदार आहेत. तर राज्यातील सर्वात कमी निधी वापरणाऱ्या पाच खासदारांमध्येही भाजपचे तिघे, शिवसेना-राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक खासदार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रश्न विचारुन यंदा संसदरत्न पटकवणाऱ्या सुप्रिया सुळेही कमी खासदार निधी वापरणाऱ्यांच्या यादीत आहेत.
दरम्यान सर्वाधिक निधी खर्चून जनतेची कामे करणाऱ्या सोमय्या यांचे तिकीट कापले गेले असून अल्प खासदार निधी वापरणाऱ्या खासदार प्रीतम मुंडे यांना मात्र भाजपने उमेदवारी दिली आहे. सोमय्या यांचे मतदार संघात मोठे काम असताना केवळ शिवसेनेच्या दबावामुळे तिकीट कापले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

