मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र तरीही लोकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. हि परिस्थिती पाहता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संचारबंदी लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.
गर्दी कमी होण्यासाठी राज्यसरकार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात येत आहे. त्यात लोकलही बंद करण्यात आली आहे. लोकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, नाईलाजास्तव महाराष्ट्रातील नागरी भागात १४४ कलम लागू करत आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले होते.
त्यावर “परिस्थिती गंभीर आहे. करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८९ झाली आहे. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत. उद्धव ठाकरेजी संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे. परिस्थितीचा विचार करता…अभी नही तो कभी नही”. असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. तसेच यात यात त्यांनी रस्त्यांवरील वाहतुकीचे फोटो शेअर केले आहेत. यात त्यांनी म्हटलं आहे की. “तुमच्या कामाची प्रशंसा होते आहे पण काही जण गंभीर नाहीत. संकट किती भयंकर आहे याची कल्पना काही लोकांना नाही. लॉक डाउन ने भागेल असे वाटत नाही. संचारबंदी लागू करा”. अशी मागणीच त्यांनी या ट्विट मधून केली आहे.
दरम्यान, भारतात सध्या करोना रुग्णांची संख्या ३९३ वर पोहचली आहे. त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही ८९ झाली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.


