पुणे : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र हा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी उपाशी आणि किरकोळ विक्रेते तुपाशी अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे.
तसेच शेतकऱ्यांकडून १०-२० रुपये किलोने घेतलेला भाजीपाला ग्राहकांना मात्र ५० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे भाजीपाल्यासाठी मोजत असलेला चढ्या भावाचे पैसे शेतकऱ्यांच्या नाही तर विक्रेत्यांच्या खिशात जात आहेत.
प्रशासनाकडून अद्याप अश्या विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शेतकरी कमी भाव मिळत असल्यामुळे, तर ग्राहक भाव वाढीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मधल्यामध्ये हा पैसा विक्रेत्यांच्या खिशात जात आहे.
दरम्यान, किरकोळ बाजारात ज्या भावात भाजीपाला विकला जात आहे. त्याचा निम्मा तरी भाव शेतकऱ्यांना द्यावा. शेतकरी अनेक संकटांचा सामना करत शेतमाल बाजारात आणतो. मात्र तो शेतमाल विक्रेता कवडी मोल भावात विकत घेतो.


