सोलापूर : गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणेनंतर आता सोलापूरमध्ये देखील दहा दिवसांसाठी संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. सोलापूर शहरासह आसपासच्या ग्रामीण पाच तालुक्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात न येता उलट वरचेवर वाढतच चालल्यामुळे संपूर्ण शहरासह संबंधित पाच तालुक्यांमध्ये टाळेबंदी लागू करण्यावर प्रशासनाचे एकमत झाले आहे.
जिल्हा दंडाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी १६ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते २६ जुलैपर्यंत दहा दिवसांसाठी संपूर्ण संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. सोलापूर शहराससह लगतच्या उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यासह अक्कलकोट, बार्शी व मोहोळ आदी भागात, जेथे जास्त प्रमाणात बाधित रुग्ण वाढले आहेत, त्या त्या सर्व गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी पुकारण्यात येत आहे.
दरम्यान, भाजपचे माजी मंत्री विजय देशमुख यांनी तातडीने संचारबंदी लागू करण्याचा आग्रह धरला आहे. तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, सिटूचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम आदींनी त्यास कडाडून विरोध दर्शविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही संचारबंदीचा निर्णय घाईगडबडीत न घेता विचारपूर्वक घ्यावा, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनावर सोपविला होता.
पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची बैठक झाली. या बैठकीत टाळेबंदी लागू करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिका सभागृहनेते श्रीनिवास करली यांनीही भाग घेतला होता.
मोठी बातमी : वाचा पाचव्या लॉकडाऊनमध्ये काय होणार सुरु…
कॉंग्रेसला मोठा धक्का,आमदारकीचा राजीनामा देत ‘या’ बाहुबली नेत्याने केला भाजपात प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

