औरंगाबाद: सत्ताधारी राजकीय पक्षांनी षडयंत्र रचून माझा निवडणूक अर्ज बाद करण्यास भाग पाडले. दबावाखाली काम करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे. माझा निवडणूक अर्ज वैध ठरवावा किंवा निवडणूक रद्द करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे कॉंग्रेसचे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील उमेदवार रमेश गायकवाड यांनी बुधवारी (ता. नऊ) पत्रकार परिषदेत सांगितले.
कॉंग्रेसने विधानसभेच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून रिपाइंचे (डेमॉक्रॅटिक) रमेश गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरविला. शपथपत्रात त्रुटी असल्याचे कारण गायकवाड यांना देण्यात आले होते. या विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, ती परत घेतली.
दरम्यान, बुधवारी पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांनी षड्यंत्र रचून माझा अर्ज बाद केल्याचा आरोप केला. कॉंग्रेसतर्फे एक व अपक्ष एक असे दोन अर्ज भरले होते. शपथपत्रात दुरुस्ती करण्यासाठी मला वेळ देण्यात आला होता. त्यानुसार दुरुस्तीही केली. मात्र, त्याचा विचार न करता, अर्ज फेटाळण्यात आला. याविरोधात आपण आयोगाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला नगरसेवक कैलास गायकवाड, रमेश जायभाये, सचिन गंगावणे, विजय तुपे, विशाल नावंदर यांची उपस्थिती होती.
सहा जणांच्या अर्जातही रकाने रिकामे
गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली होती. समाजाच्या सर्वस्तरातून मला पाठिंबा मिळत होता. त्यामुळे मला संपविण्यासाठी अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. माझ्याप्रमाणेच सहा उमेदवारांच्या अर्जात देखील कॉलम सहामध्ये परिपूर्ण माहिती नाही, त्यांचे अर्ज बाद का झाले नाही? असा प्रश्न गायकवाड यांनी केला.


