टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (ता. ७) उद्योग क्षेत्रातील उद्योगपतींची बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच मोठ्या उद्योगसमुहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, आदि गोदरेज, सज्जन जिंदाल, उदय कोटक, दीपक पारेख, गौतम सिंघानिया, बाबा कल्याणी आदी नामवंत उद्योगपती उपस्थित राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील उद्योगक्षत्रात वाढ व्हावी आणि राज्याच्या विकासाबाबत मुख्यमंत्री या उद्योग प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी राज्यातील आर्थिक क्षेत्राची सद्यस्थिती आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भातील माहिती उद्योगपतींकडून जाणून घेतील. तसेच राज्याच्या विकासाचा आराखडा बनविताना त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील प्रमुखांच्या सूचनांचा योग्य विचार केला जाणार आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. त्यात उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. राज्याला २०२५ पर्यंत सहस्त्र अब्ज डॉलर (ट्रिलिअन) अर्थव्यवस्थेपर्यंत नेण्याचा मानस आहे. त्यामुळे देशाच्या जीडीपी आणि एफडीआय मध्ये राज्य कायम अग्रेसर रहावे आणि ओद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून ओळखले जावे यासाठी सर्व क्षेत्रांच्या सहभागातून आराखडा बनविण्यात येणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

