मुंबई : ”रश्मी वहिनी या कर्तृत्वान आहेत. त्यांचं मी कौतुक केलं होतं. मात्र त्यांच्याकडून अशा टीकेची अपेक्षा नाही,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच मी अग्रलेख लिहित नाही असं जर त्या म्हणत असतील तर मग संपादक का झालात? असा सवालही त्यांनी यावेळी केला. आम्हालाही टीका करता येते मात्र मर्यादा कुणीही सोडू नये, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, १ मार्च पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या ‘सामना’च्या संपादकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर आज त्यांनी सामनाच्या संपादकीयमधुन चंद्रकांत पाटलांवर सणकून टीका केली. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ आहेत. तेसुद्धा आता फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून नको तिथे जीभ टाळ्यास लावीत आहेत, अशी टीका केली होती. त्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, रश्मी ठाकरे यांनी सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद स्विकारावं असं मी काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो. त्यावेळी त्यांनी ठाकरे घराण्यात पदं घेत नाहीत असं सांगितलं होतं. आता सगळीच पदं ते घेत आहेत असं कसं असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, सामनाच्या संपादकीय मध्ये शिवसेनेने भजापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केलीय. पाटील यांनी औरंगाबादचे तातडीने संभाजीनगर असं नामकरण करण्याची मागणी केल्यानंतर ‘सामना’च्या अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे. औरंगाबादचं या आधीच बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर असं नामकरण केलंय. त्यामुळे पाटील यांनी उगाच तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही.
तसेच भाजपचे नेत्यांचं बरच काही सरकलं आहे असंही शिवसेनेने म्हटलं आहे. दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधडय़ा भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती. दादामियां, हे ध्यानात ठेवा! असंही ‘सामना’त म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

