पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्जमुक्तीचं दिलेलं वचन पूर्ण करावं या मागणीसाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. आज राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
महाविकासआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत दिली नाही, फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. या राज्य सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरुद्धही भाजपनं प्रश्न उपस्थित केले आहेत. नवी मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार आज भाजपकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सर्व पदाधिकारीही आझाद मैदानात आंदोलनाला बसणार आहेत.
तर दुसऱ्या बाजूला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी तसेच महिला अत्याचारविरोधी कायद्याच्या मागणी केली. तसेच सभागृहाच्या वेलमध्ये उतरत सरकारविरोधी घोषणाबाजी देत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विरोधकांच्या गोंधळातच सभागृहाचे दिवसभराचे कामकाज पार पडले.


