मुंबई : देशातील पाच राज्यांसह उत्तर प्रदेश मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दलिताच्या घरी जेवल्याचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. यावर आजच्या सामना आग्रलेखातून शिवसेना खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राऊत लिहितात, डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला तिच्यात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. महात्मा फुले यांनी त्यांच्या वाड्यातली विहीर दलितांसाठी खुली केली. महाडला जो चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला त्यात डॉ. आंबेडकरांच्या चार पावले पुढे सुरबानाना टिपणीस वगैरे प्रमुख लोक होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी अशा समाजोद्धाराच्या कामात नेहमीच पुढाकार घेतला. आध्यात्मिकदृष्ट्या हिंदू धर्मात काही दोष आहेत. सर्वात मोठा दोष म्हणजे चातुर्वर्ण्य. चातुर्वर्ण्य पद्धतीचे समर्थन संघाच्या धुरिणांनी अनेकदा केले म्हणूनच ते दलितांना वेगळे मानून त्यांच्या घरी जेवण्याचे कार्यक्रम साग्रसंगीत करीत असतात.
एकाने विद्या शिकावी, दुसऱ्याने शस्त्र धरावे, तिसऱ्याने व्यापार करावा आणि चौथ्याने हलक्या दर्जाची सेवा करावी ही व्यवस्था व्यक्तीच्या आत्मोन्नतीला मुळीच पोषक नाही. भाजपच्या पुढाऱ्यांना आजही दलितांकडे दलित म्हणून जेवणाचे कार्यक्रम करून त्याचा बोभाटा करावा लागतो याचा सरळ अर्थ असा की, त्यांच्या मनात ‘जात’ आहे व ती जात घालवायची त्यांची तयारी नाही. आज साराच देश राजकीय फायद्या-तोट्यासाठी जातीय चौकटीत वाटला गेला आहे. त्यामुळे जातीपातीचे निर्मूलन हे थोतांड ठरले आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजघटकांचे ठीक आहे, आज सगळ्यांनाच नोकरी, शिक्षणात प्राधान्य हवे आहे. निवडणुकांतदेखील जातीची खोटी प्रमाणपत्रे वापरून लोकांची दिशाभूल केली जाते व नंतर त्यांच्या निवडणुका कोर्टाकडून रद्द केल्या जातात. अशाने समाज कसा पुढे जाईल?
महाराष्ट्र जातीप्रथेविरोधात लढत राहिला. जोतिबा फुले यांनी १८७३ मध्ये ‘गुलामगिरी’ या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात ‘जातीभेदांचे थोतांड’ असा शब्दप्रयोग वापरला. १८१८ साली पेशवाई बरखास्त झाली. पेशवाईत जातीभेदासंबंधीचे सर्व दुष्ट प्रकार अस्तित्वात आले होते. त्या स्थितीवर पहिले प्रहार लोकहितवादींनी केले. त्यानंतर न्या. महादेव गोविंद रानडे यांनी तोच विचार पुढे नेला. लोकमान्य टिळकांनी राजकीय सुधारणांवर भर दिला तर आगरकरांनी सामाजिक सुधारणांना अग्रहक्क देण्याचा विचार मांडला. आगरकर सांगतात, ”जातीमुळे आपला देशाभिमान संकुचित झाला आहे. जातीमुळे ज्ञान, कला, शास्त्र वगैरे तेथल्या तेथे कोंडल्यासारखी झाली आहेत. जातींमुळे सर्व आचारात व विचारात मतभेद निर्माण होऊन ती परस्पर वैरास, छळास आणि मत्सरास कारण ठरली आहेत.
जातींमुळे अन्न-व्यवहार-विवाह वगैरेंच्या संबंधात कितीतरी गैरसोय झाली आहे. जातीभेदांमुळे आमची भुतदया, आमचे बंधुप्रेम, आमची उदारता, आमची धर्मबुद्धी, आमची परोपकार वृत्ती, आमचे विचार यांचे क्षेत्र कितीतरी मर्यादित झाले आहे, याची कल्पना लोकांना येत नाही.” आगरकरांनी हे सांगून दशके लोटली, पण आज परिस्थिती काय आहे? आजही मतदारसंघांमध्ये जातीची गणिते पाहून उमेदवाऱ्या दिल्या जातात. जातीस महत्त्व देऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान जेवणावळीचा कार्यक्रम करतात. मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन घडवायला!
महत्वाच्या बातम्या
‘नया नया पंछी ज्यादा फडफड करता है’; विजय वडेट्टीवार यांची पडळकरांवर टीका
किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर स्टार प्रवाहची पहिली प्रतिक्रिया; ‘महिला नायिकांशी गैरवर्तन..’
औरंगाबादेत मोकाट जनावरांचा सुळसुळाट; महापालिकेची ‘ती’ घोषणा हवेतच विरली!
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’; रवी राणांचा शिवसेनेवर हल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

