🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त शुक्रवारी मुंबईत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करण्याच्यादृष्टीने पक्षाने या मेळाव्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून ५ लाख लोक कार्यकर्ते राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी काल रात्रीपासूनच भाजपाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरूवात झाली. भाजपाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यभरातून ३४ रेल्वेगाड्यांमधून भाजपाचे कार्यकर्ते येथे दाखल होणार असून, सात हजारांहून अधिक बसमधून कार्यकर्ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाहून येथे येणार आहेत. याशिवाय दहा हजार लहान वाहनांतून कार्यकर्ते बीकेसीत येणार आहेत.
मुंबईत प्रवेश करणाऱ्या चार चेक नाक्यांवर मालवाहने आणि अन्य अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बेस्टकडूनही १७० जादा बसगाडय़ांचे नियोजनही करण्यात आले आहे. सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांसाठी नियमावली आखून देण्यात आली आहे. मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर चेक नाका, मुलुंड पश्चिमेकडील मॉडेला चेक नाका, ऐरोली चेक नाका आणि वाशी चेक नाक्यांवर अवजड आणि मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबई पोलिसांनी अवजड आणि मालवाहतूक वाहनचालकांना अन्य मार्गाचा वापर करण्याची सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, एलबीएस रोडवरील सुर्वे जंक्शन, सायन जंक्शन, धारावी टी-जंक्शन, हंसभुग्रा मार्ग, सीएसटी रोड, नेहरू रोड, शारदादेवी रोडवरील प्रवास टाळा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

