टीम महाराष्ट्र देशा : ‘कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नाही. कर्जमाफीमुळे नियमित कर्जदारांवर अन्याय होतो. शेती हवामानावर अवलंबून असल्याने शासनाने शेतकऱ्यांना ताकद देणे गरजेचे आहे. परंतु शेतकऱ्यांनीही बाजारपेठेचा अंदाज घेऊ न पीक उत्पादन घेणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केले.
याच पार्श्वभूमीवर भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपने ट्वीट करत शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. ‘राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी नेहमीच्या सवयी प्रमाणे सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफी संदर्भात यु टर्न मारला आहे,’ असा टोला भाजपने पवारांना लगावला आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते @pawarspeaks नेहमीच्या सवयी प्रमाणे सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफी संदर्भात यु टर्न मारला आहे .
सत्तेत येण्यापुर्वी “बिनशर्त कर्जमाफी” मागणारे पवार साहेबांनी आता “कर्जमाफी हा तोडगा नाही” असे म्हणत सामान्य शेतकर्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर खूपसला आहे. pic.twitter.com/Qy50hhtInA— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 3, 2020
तसेच ‘सत्तेत येण्यापुर्वी “बिनशर्त कर्जमाफी” मागणारे पवार साहेबांनी आता “कर्जमाफी हा तोडगा नाही” असे म्हणत सामान्य शेतकर्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर खूपसला आहे,’ अशी घणाघाती टीका भाजपने केली आहे.
काय म्हणाले होते शरद पवार
सध्या राज्यात तीन लोकांचा संसार एकत्र बांधून चालवायचा आहे. यामध्ये एकालाच पुढे घेऊ न जाऊ शकत नाही. मात्र या सरकारमध्ये सगळे समन्वयाने काम करत आहेत आणि राज्याच्या दृष्टीने हे चांगले दिशादर्शक असल्याचे सांगत पवार म्हणाले, की पूर्वी कर्जदारांना ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती. या कर्जमाफीने देशातील शेतकऱ्यांना उभारी मिळाली होती. त्या काळात परदेशातून धान्य आयात करणारा आपला देश जागतिक बाजारपेठेत धान्य निर्यात करायला लागला. त्यातून परकीय चलनासह जागतिक व्यापारात स्थान, परकीय चलन वगैरे फायदे आपल्या देशाला झाले. त्यानंतर जागतिक हवामान बदलले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
पण त्यामुळे त्या-त्या राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या वेळी दीड लाखाची कर्जमाफी दिली आहे. यातून ३२ लाख शेतकऱ्यांना २९ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. मात्र सरसकट कर्जमाफीची, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी मदतीची मागणी केली जात आहे. या सर्व विषयावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अजित पवार, बाळासाहेब पाटील, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदींची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती याबाबत निर्णय घेणार आहे. या समितीचा निर्णय आल्यानंतर याबाबत सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही पवार म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

