🕒 1 min read
मुंबई : अभिनेता सलमान खान(Salman Khan) याला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर सर्पदंश झाला, त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आजच्या आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. लेखात ते म्हणाले आहेत की,’देशभरात दरवर्षी लाखाहून अधिक लोकांना साप चावतात , पण बातमी होते ती ‘सलमानला साप चावला ‘ ही. पुन्हा साप माणसाला ‘प्यारसे ‘ चावतो आणि तो चावल्यानंतरही माणूस त्याला ‘ प्यारसे ‘ वागवतो , अशी प्रेमळ शिकवणही ‘सर्पमित्र ‘ सलमान खानमुळे जगाला समजली. तसेच सलमानला साप चावला या बातमीमुळे ‘बापरे’ , सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली.’
पुढे ते म्हणाले की,’अभिनेता सलमान खानला सर्पदंश झाल्यानंतर आधी त्यासंदर्भात सर्पदशांच्या बातम्या आल्या, त्यानंतर तो दंश बिनविषारी सापाचा असल्याने सलमान खान सुखरूप असल्याच्या दिलासादायक ‘फॉलोअप स्टोरीज’ही प्रसिद्ध झाल्या. हल्ली बातम्यांचा ‘जीव’देखील घटनेचा ‘कर्ता’ कोण यात अडकलेला असतो. या घटनेत तर सलमान खानसारखा ‘कर्ता’ आणि सर्पदंशासारखे ‘कर्म’ होते. त्यामुळे मीडियामध्ये त्याच्या बातम्यांनी दोन दिवस जागा घेणे स्वाभाविकच होते. सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आहे. अनेकदा तो वादाच्या भोवऱयात सापडला असला तरी अभिनय आणि ‘बिइंग ह्युमन’सारख्या त्याच्या सेवाभावी संस्थेमार्फत होणारे समाजकार्य यामुळेही तो बऱयाचदा चर्चेत असतो. हिंदी सिनेसृष्टीत या ‘भाईजान’चे फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. त्यामुळे त्याच्याबाबतीत थोडे जरी खुट्ट झाले की, त्याची ‘बातमी’ होणारच. येथे तर घटना सर्पदंशाची होती. त्यामुळे त्याची ‘बातमी’ होणारच होती, तशी ती झाली आणि सर्वच माध्यमांमध्ये ठसठशीतपणे झळकलीही! सलमान सुखरूप आहे आणि त्याला झालेला दंश बिनविषारी सापाचा होता, हेदेखील लोकांना बातम्यांमुळेच समजले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचाही जीव भांडय़ात पडला. सलमान सुखरूप आहे. त्याला झालेला दंश बिनविषारी सापाचा होता, ही परमेश्वराचीच कृपा आणि ती त्याच्यावर नेहमीच असूदे मात्र या बातम्यांमुळे ‘सापसुद्धा चावतो’ आणि ‘सर्पदंश बिनविषारी सापाचाही असू शकतो’ ही ‘बातमी’ सामान्य माणसाला नव्याने समजली, हे काय कमी झाले?
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’जगात सुमारे दीड लाख लोक सर्पदंशाने मरण पावतात. सुमारे ४ लाख लोकांना सर्पदंशाने कायमचे शारीरिक आणि मानसिक अंपगत्व येते. गंभीर बाब म्हणजे जगातील सर्पदंशाच्या घटनांपैकी निम्म्या आपल्या देशात आणि त्यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रात घडतात. म्हणजे हिंदुस्थानात दरवर्षी लाखभर लोकांना संर्पदंश होतो तर महाराष्ट्रात हीच संख्या ३५ ते ४० हजार एवढी आहे. २०१८-१९ मध्ये महाराष्ट्रात तब्बल ४२ हजार लोकांना साप चावला होता. सर्पदंशाने बळी जाणाऱ्यांची महाराष्ट्रातील संख्यादेखील ४ ते ५ हजार एवढी मोठी आहे. त्यात नाशिक, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगली हे जिल्हे आघाडीवर आहेत. नाशिकचा क्रमांक तर देशात दुसरा आहे. कोकणात सर्पदंशाच्या घटना नेहमीच घडत असतात. कोकण हे भयंकर विषारी सापांचे आगरच आहे. त्यामुळे ‘बातमी’ वाटणार नाही एवढय़ा तेथे सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यू ‘कॉमन’ आहेत. पुन्हा सर्पदशांवरील उपचारांची जेथे शहरी भागात बोंब तेथे ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागाची काय कथा? हिंदुस्थानसह जगात ‘सर्पदंश दिन’ साजरा करून जनजागृती केली जात असली तरी सर्पदंशाच्या घटना आजही ‘बातमीआड’च राहतात’,असेही राऊत लेखाच्या शेवटी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला वेग; 174 संपकऱ्यांना केलं बडतर्फ
- राज्यात लावलेल्या नव्या निर्बंधानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना
- कालीचरण महाराजांना महात्मा गांधींबाबत केलेलं वक्तव्य भोवलं; एफआयआर दाखल
- विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका; नाना पटोलेंचा आरोप
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
