🕒 1 min read
मुंबई: सध्या संपूर्ण राज्यभरात सध्या एका पोलीस अधिकाऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. मनसुख हिरेन प्रकरणी भाजपने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली होती. ठाकरे सरकार वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, फडणवीस यांनी विधिमंडळात याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. ज्यांच्याविरुद्ध एवढे पुरावे आहेत, त्यांना उद्धव ठाकरे डिफेंड करत आहेत. मला समजत नाही की अशी कोणती माहिती त्यांच्याकडे आहे की त्यांना वाचवलं जात आहे? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हेच मुद्दे गाजले तर यावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. यावरून या प्रकरणाचा संपूर्ण उहापोह करत आजच्या सामनातून शिवसेनेने विरोधी पक्ष भाजप या प्रकरणात घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला आहे.
‘मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले. त्या ढवळण्यातून विरोधी पक्षाने काय मिळवले, याचे उत्तर ‘गमावलेला आत्मविश्वास’ असेच द्यावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमच विरोधी पक्षनेता म्हणून सूर सापडला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ विरोधी पक्षनेत्यांवर राहिला हे सगळय़ात मोठे यश. बुधवारी दुपारी सुधीर मुनगंटीवार सभागृहात आले व म्हणाले, ”पुढच्या तीन महिन्यांत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ.” हा फाजील आत्मविश्वास आहे, सरळ स्वप्नरंजन आहे. पुन्हा सत्तेवर येण्याची भाषा म्हणजे पुन्हा पहाटे किंवा मध्यरात्रीच्या शपथविधीची तयारी. त्यासाठी नवा घोडेबाजार होणार असेल तर भारतीय जनता पक्ष आपली उरलीसुरली प्रतिष्ठाही गमावून बसेल.
मुकेश अंबानी यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव देशासाठी किती महत्त्वाचा आहे हे देशवासीयांना गेल्या पंधरा दिवसांत नव्याने समजले हे बरे झाले. एका भल्यापहाटे एक स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या आलिशान निवासस्थानाच्या परिसरात उभी राहते. त्या गाडीबाबत संशय येऊन पोलीस तेथे पोहोचतात. त्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांडय़ा सापडतात. त्यानंतर एका दहशतवादी संघटनेचा धमकीवजा संदेश मिळतो. अंबानी कुटुंबाला मारण्याचा हा कट असल्याचे त्यावर सांगितले गेले. हा कट असेल तर कोणी केला व अंबानी कुटुंबास ठार करण्याचा कट ‘जैश-उल-हिंद’ने का रचावा? 21 जिलेटिनच्या कांडय़ा व एक स्कॉर्पिओ हा अंबानींसारख्या अतिसुरक्षित व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे. अशी टीका आजच्या सामना च्या रोखठोक या सदरातून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पराभवानंतरही संघात बदल होणार नाही ; आम्ही असेच खेळणार’
- ‘या’ कारणामुळे महावितरणने केला ग्राहकांचा सत्कार
- ‘…तर भारतीय जनता पक्ष आपली उरलीसुरली प्रतिष्ठाही गमावून बसेल’
- मार्वलच्या भारतीय फॅन्ससाठी मोठी खुशखबर!
- वादातून विवाहितेचा विनयभंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

