🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा झाली. गुढीपाडवा सभा झाल्यानंतर राज ठाकरे यांची ही चौथी सभा होती. यापूर्वी त्यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथे जाहीर सभांना संबोधित केले होते. मुंबईच्या सभेत मशिदींवरील भोंग्यावरुन राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यासोबतच यापूर्वी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली होती. आज पुन्हा पुण्यातल्या सभेत त्यांनी ही मागणी केली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी करतो.” तसेच त्यांनी औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करण्याची मागणी ही केली. आजच्या सभेत राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून अजूनही माझ्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवावेत, अशी माझी मागणी आहे. कारण फक्त आवाजाची पातळी कमी करणे पुरेसे नाही. आता त्यांना पूर्णपणे काढून टाकण्याची वेळ आली आहे. कारण ते आता घडले नाही तर पुन्हा कधीच होणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे सरकारला घेरताना दिसत आहेत. लाऊडस्पीकरच्या वादावर राज ठाकरेंनी उद्धव सरकारची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील अभिनेता संजय दत्तच्या भूमिकेचा संदर्भ देताना ते म्हणाले होते, “अभिनेत्याला चित्रपटात महात्मा गांधींची प्रतिमा दिसू लागते. मुन्नाभाई आपण महात्मा गांधींशी बोलतोय असा विचार करायला लागतो, पण चित्रपटाच्या शेवटी हा ‘केमिकल लोचा’ असल्याचं समोर येतं. आपल्याकडेही अनेक मुन्नाभाई फिरत असतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर केली होती.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरे हिंदू असल्याचे वक्तव्य केले होते. यावर पलटवार करताना राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव यांचे हे विधान अगदी पोरकट आहे. ते विचारतात की खरा हिंदू कोण? हे ऐकून मला हसू येतं आणि विचारावंसं वाटतं की, तुझा शर्ट जास्त पांढरा आहे की माझा.
राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो. जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलत आहेत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं, ते तिथून झालं. महाराष्ट्रात रेल्वे भरती होती याच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात कुठेही नाही. पण त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारच्या वर्तमानपत्रात येत होत्या. तिथल्या रेल्वे भरतीमध्ये तिथल्या मुलांना नोकऱ्या मिळायला हव्यात. महाराष्ट्रातल्या भरतीमध्ये इथल्या मुलांना नोकऱ्या मिळायला हव्यात. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यानंतर स्थानिक भाषांमध्ये परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. हे त्या आंदोलनाचं यश आहे”.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
