🕒 1 min read
लातूर : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले सरकार ज्या योजना राबवीत आहे त्या योजना सर्वसामान्यांना नव्हे, तर कंत्राटदारांना डोळ्यासमोर ठेवून राबविल्या जात आहेत, अशी टीका करीत भाजपने मूळ भाजपचा असलेला उमेदवार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवून दाखवावा, असे जाहीर आव्हान आमदार अमित देशमुख यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना सत्ताधाऱ्यांना दिले आहे.
शहरातील प्रभाग तीन, चार, पाच व दहा प्रभागातील विविध विकासकामांचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कॉंग्रेसच्या जनसंपर्क अभियानाला सुरवात झाली आहे. यात विविध विकासकामांची सुरवातही करण्यात आली आहे. यामध्ये इंदिरानगर भागात बांधण्यात येत असलेल्या आणि नागपूर येथील चैत्यभूमीची प्रतिकृती असलेल्या बौद्धविहराची पाहणी देशमुख यांनी केली.
संत गोरोबा सोसायटीमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन, तुळजाभवानीनगर भागात भोईवाडा सामाजिक सभागृहाचे लोकार्पण, इंडियानगर येथील पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असलेल्या भागात पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी विंधनविहीर घेण्याच्या कामाला सुरवात, संजयनगर भागातील समाजमंदिर बांधकामाची सुरवात, बादाडेनगर भागातील नागरी आरोग्य केंद्र विस्तारीकरणाची सुरवात देशमुख यांच्या हस्ते झाली.
भारतीय जनता पक्ष आयात केलेल्याच उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. या अन्य पक्षांतून आयात केलेल्या उमेदवाराऐवजी स्वतःच्या पक्षातील उमेदवारांना विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवावे, असे जाहीर आव्हान देशमुख यांनी यावेळी दिले.
-
शरद पवार, अजिदादा भाजपात येतील की काय अशी शंका वाटायला लागलीय’
-
छगन भुजबळ यांनी रिपब्लिकन पक्षात यावे – रामदास आठवले

