बारामती – बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत या पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते, पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना आणि शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पहाणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भिगवण रस्त्यावरील अमरदिप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हा नदीवरील खंडोबानगर येथील पूल, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पहाणी केली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. पुढील काळात पुरस्थिती टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण करणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण हटविणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत अतिक्रमणे होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बारामती तालुक्यातील कऱ्हावागज-अंजनगाव येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसेच बारामती-फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करुन याठिकाणची वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना उपमख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, नगरसेवक सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
- शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आता फडणवीस जाणार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
- निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष बांधावर जाणारे उद्धवजी आता आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत : मनसे
- ‘लोकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा’
- सरकारने अहमदनगर जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा- शिवाजी कर्डिले
- शासनाकडे पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मिळवून देऊ : सुभाष देशमुख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

