मुंबई – नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा निर्णय दिला. या कायद्यांमुळे निर्माण झालेला पेच दूर करण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.
संसदेने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या आणि दिल्लीच्या सीमेवरुन शेतकऱ्यांना हटवण्यासंदर्भात दाखल झालेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. हा प्रश्न जास्तीत जास्त चांगल्या मार्गानं सोडवण्याचा आपला प्रयत्न असून कायदे निलंबित करण्याचा अधिकारही आपल्याला आहे, असं न्यायालयानं सांगितलं.
या प्रश्नी तोडगा काढण्यात ज्यांना खरोखरच रस आहे, त्यांनी या समितीपुढे बाजू मांडायला यावं, असं न्यायालयानं सांगितलं. ही समिती कोणताही आदेश देणार नाही किंवा शिक्षा सुनावणार नाही, ही समिती केवळ आपला अहवाल सादर करेल, असंही न्यायालयानं सांगितलं. येत्या प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची नियोजित ट्रॅक्टर रॅली थांबवण्यासाठी दिल्ली पोलीसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयानं शेतकरी संघटनांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर नवीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अनेक दिवस ऊन, वारा, थंडी, पावसाची कसलीही तमा न बाळगता केंद्रसरकारच्या दारात शेतकरी आंदोलनासाठी बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांना दाद दिली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही आली नव्हती, असेही जयंत पाटील म्हणाले.
जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत दिल्लीत आंदोलनासाठी बसलेला शेतकरी मागे हटणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्यादृष्टीने जो कायदा स्थगिती योग्य आहे. तो कायदा रद्द करण्याची भूमिका केंद्र सरकारने लवकरात लवकर घ्यावी असेही जयंत पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी अहंभाव सोडण्याची वेळ आली असून ते लवकरच तो सोडतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर सायनाचा थायलंड ओपनचा मार्ग मोकळा !
- सरकारने आडमुठेपणाचे धोरण सोडले पाहिजे; कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून नवाब मलीकांची टीका
- विनायक राऊत मातोश्रींवरचा टॉमी,त्याला कोकणात राणेंवर भुंकायला पाठवलाय – निलेश राणे
- कोरोना अंताचा लढा सुरु : राज्याला मिळाले ९ लाख ६३ हजार डोस; ५११ ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज
- माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जो कुणी येईल त्याचा तिथंच बंदोबस्त केला जाईल – निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

