टीम महाराष्ट्र देशा : ‘पुण्यातील सॉलिड वेस्ट मटेरिअल मॉडेल मुंबईत आणणार, त्याचबरोबर बांबू आणि कापडी पिशवी ही संकल्पना राज्यातच नाही देशात देण्याची गरज आहे,’ असे मत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुणे येथे व्यक्त केले.
ते ‘कार्बन न्यूट्रल 2030 कॉन्फरन्स’नंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, ‘पुण्यात इको-फ्रेण्डली मटेरिअल वापरले जातात. त्यामुळे महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते,’ असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
तसेच पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, ‘राज्यात पर्यावरणाला हानी होणाऱ्या ठिकाणी स्थगिती दिली जाईल. मेट्रोचं काम थांबलं नसून वस्तूस्थिती जाणून घेतली पाहिजे. तुम्हाला जर झाडं तोडायची असेल तर करा, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, पुण्यातील बीआरटी प्रकल्प गुंडाळणार असेल तर इतर पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. ई-रिक्षा, ई-सायकल पर्यायी विचार करणं गरजेचं आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच आरे कॉलनीतील मेट्रोचे शेड आणि नवी मुंबईतील गोल्फ क्लबसह इतर प्रकल्पाच्या स्थगितीवरुन सरकारवर आरोप होत आहेत. मात्र, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या विरोधात असेल तिथे स्थगिती दिली जाईल, असे ते म्हणाले.


