औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत तीनही मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचा एकही उमेदवार नाही. कॉंग्रेसच्या या वाताहतीमुळे जुने पदाधिकारी संतप्त झाले असून, ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रभान पारखे यांनी बुधवारी (ता. नऊ) एका बैठकीत शहराध्यक्ष नामदेव पवार यांना राजीनामा मागितल्याने खळबळ उडाली. त्यात विधानसभेच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय होऊ शकला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्हा कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसची वाताहत झाली असून, विधानसभेच्या निवडणुकीत तर अनेक मतदारसंघात उमेदवारही मिळत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात रिपाइं डेमॉक्रॅटीकचे रमेश गायकवाड यांना कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची विनंती करण्यात आली.
दुसरीकडे पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षाला सोडण्यात आला. मात्र रमेश गायकवाड यांचा अर्ज बाद झाल्यामुळे कॉंग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. आता कोणाला पाठिंबा द्यायचा यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. सोमवारी (ता. सहा) झालेल्या बैठकीत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे बुधवारी एका हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रभान पारखे यांचा पारा चांगलाच चढला. कॉंग्रेसच्या या वाताहतीला जबाबदार कोण? असा थेट प्रश्न त्यांनी शहराध्यक्ष पवार यांना केला. शहरातील दोन्ही जागा कॉंग्रेसला मिळाल्या नाहीत तर राजीनामा देईन, असे तुम्ही सांगितले होते. आता राजीनामा द्या, अशी मागणी त्यांनी केल्यामुळे बैठकीत खळबळ उडाली. पश्चिम’मध्ये उमेदवार निवडताना कोणाला विश्वासात घेतले होते? असा प्रश्नही पारखे यांनी केला.
आता पक्ष घेणार निर्णय
या वादावादीनंतर पश्चिम मतदारसंघात पाठिंबा देण्यासाठी दोघांच्या नावावर चर्चा झाली. विनोद माळी व पंकजा माने या दोघांनी कॉंग्रेस पक्षाकडे तिकीट मागितले होते. मात्र, तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. दोघांची नावे त्यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182202339727302658?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182200941572804608?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

