औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात कोरोनाविरोधात जबरदस्त लढा दिला आहे. तसेच कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु औरंगाबाद शहरात लॉकडाऊनचे नियम सगळ्यांना सारखे लावा, काही भागात नियमांचे उल्लंघन होत आहे अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की, कठोर नियम फक्त शहरात हिंदुबहुल भागातच होत असल्याचे चित्र शहरात आढळुन येत आहे. फक्त याच भागातील व्यापारी व प्रतिष्ठाणे यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करुन दंड वसुल करुन त्यांच्या दुकानांना सिल करण्यात आले. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. विशिष्ट भागात खरेदीच्या नावाखाली जमावाने विना मास्क फिरुन एका अर्थाने कोरोना संसर्ग वाढीला चालना देत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे.
वास्तविक पाहता शहरातील सर्व हिंदु बांधवांनी या वर्षभरात झालेले सर्व सण उदा. गुढीपाडवा असेल, रामनवमी, हनुमानजयंती, भिमजयंती, महावीर जयंती, महाराणा प्रताप जयंती हे सर्व उत्सव वर्षातुन एकदाच येत असतात. तरीदेखील सर्वांनी आपल्या घरातुनच हे सर्व उत्सव साजरे केलेले आहेत. हे देखील मी आपल्या निदर्शनास आणले. तरी पण प्रत्येक मंदिराच्या परिसरात प्रचंड पोलीसांचा बंदोबस्त, ताफा लावला असुन, जर कधी भक्त चुकुन मंदिर परिसरात आला तर, त्याला धमाकवून परत पाठविले जाते, हे प्रकार पाहुन आश्चर्य वाटते.
त्या उलट शहरातील काही विशिष्ट भागात विशिष्ट धर्माची प्रार्थनास्थळे मोठ्या प्रमाणाावर सुरु असुन ही बाब अत्यंत खेदजनक आहे. तसेच या ठिकाणी प्रार्थना स्थळांकडे जातांना येतांना प्रचंड गर्दी असते तसेच मास्कचा वापर नाही, सामाजिक अंतर चे पालन नाही हे कृत्य कितपत योग्य आहे असा प्रश्न आम्हा नियम पाळणाऱ्या नागरिकांना पडला आहे. याची शहानिशा करुन सर्वांना समान न्याय असला पाहिजे. कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करतांना नियम सर्वांना सारखेच असावेत. कार्यवाही करत असतांना समान न्याय असावा अशी मागणी खैरेंनी केली. शिष्टमंडळात माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, गणू पांडे, आनंद तांदूळवाडीकर, विश्वनाथ स्वामी, राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, इत्यादींचा सहभाग होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘सुप्रीम कोर्टाने आता समांतर केंद्र सरकारही तयार करावे’, काँग्रेसची मागणी
- ‘लसींची व्यवस्था नसताना लस उत्सव कशाला साजरा केला?’, प्रियंका गांधींचा मोदींना सवाल
- भाजपच्या अतुल भातखळकरांकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या संवादाची नक्कल!
- ‘टीका करण्याऐवजी सल्ले द्या’, राजनाथ सिंहांचा काँग्रेसला टोला
- ‘घरी कडी लावून बसलेल्यांना रिकामटेकडा म्हणतात’, भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला


