टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा अखेर काल सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असणार आहे.
दरम्यान, चौथ्या टप्प्यात देशातील ७१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात एकूण ९ राज्यांमध्ये मतदान होईल. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, भाजपचे गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, तर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, संजय निरुपम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उमेदवार कोणी असले, तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठा सांभाळावी लागणार आहे.
प्रचारात शिवसेनेने आघाडी घेतली असली तरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महायुतीच्या विरोधातील जाहिर सभांचा शिवसेना उमेदवार राहूल शेवाळे यांना मोठा फटका बसेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेनेचे गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे संजय निरूपम यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. २०१४ नंतर या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपची संघटनात्मक ताकद वाढली आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही लढत काहीशी अवघड जात असली तरी ती संजय निरूपम यांनी इथं चांगली हवा केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
