🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढत आहे आता या मतभेदांनी बंडखोरीचे रूप घेतले असून पक्षाला याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. औरंगाबादमध्ये काँग्रेसला असाच झटका मिळाला आहे. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला विरोध करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबतच काँग्रेसच्या वतीने रात्री उशीरा ३५ उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना आणि लातूर मतदार संघाचे उमेदवार काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले. काँग्रेसने अखेर सर्वांचे लक्ष लागलेल्या औरंगाबादमधून सुभाष झांबड, तर जालना मतदारसंघात विलास औताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार हे औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. झांबड यांच्या उमेदवारीबाबत आपल्याला विश्वासात घेतला नसल्याचा सत्तार यांचा दावा आहे. झांबड आणि सत्तार यांच्यात सुरु असणारे शीतयुद्ध आता निर्णायक लढाईच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
