🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अधिकार नसून केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आदी मंत्र्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीकडून जबाबदारी झटकण्याचं काम सुरु आहे. ठाकरे सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं, अशा शब्दात राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यपालांना निवदेन देण्याची घाई का? त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते, सर्व मराठा संघटनांचे नेते, तज्ज्ञांना बोलवा. विचार विनिमय करा, चर्चा करुन पुढल्या पावलांबाबत निर्णय घ्यायला हवा होता, असंही राणेंनी म्हटलंय.
तसेच सध्या मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही. त्यांना आपलं मंत्रिपद टिकवण्यात रस असल्याचा टोलाही राणेंनी लगावला आहे. सरकारच्या ओठात एक आणि पोटात एक आहे. मराठ्यांना आरक्षण देणं हे या सरकारच्या मनात नाही. त्यामुळे मराठ्यांनी आता एक होण्याची गरज आहे. सगळ्या मराठा संघटनांनी एक व्हायला हवं. समाजानेही एकत्र यायला हवं, असं आवाहन राणे यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण देताना आरक्षणाचा कायदा हा फुलप्रुफ असे सांगितले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यावर ठाकरेंनी टोला लगावला आहे. ‘मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रुफ असता तर आज राज्यपालांची भेट घेण्याची वेळ आली नसती,’ असं म्हणत फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्यावर खापर फोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- बीडला मिळाला श्वास; ३७१ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स जिल्ह्यास प्राप्त
- पत्रकारांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे आपले कर्तव्य ; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा-काँग्रेस
- रेमडेसिवीरच्या धर्तीवर म्युकोरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये याची दक्षता घ्या – खा. भागवत कराड
- मैदाने आणि जॉगिंग ट्रॅक खुली करा; आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. मकरंद जोशी यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

