पुणे : आज राज्यासह देशभरात शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवभक्तांमध्ये कमालीचा उत्साह असला तरी कोरोनाचं सावट असल्याने यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्याने शिवभक्तांसह भाजप, मनसे व इतर संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सार्वजनिक ठिकाणी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे यांच्या कार्यक्रमांवर देखील सरकारने निर्बंध आणले आहेत. दरम्यान, शिवकाळापासून पोवाडयांना विशेष महत्व आहे. स्वराज्याची भावना रयतेत निर्माण करणं, महत्वाचा संदेश देणं इथपासून ते स्वातंत्र्यलढ्यात देखील देशभवना व गौरवशाली इतिहास जागवण्यासाठी पोवाडे गायले गेले आहेत. मात्र, आज शिवजयंती दिनीच पोवाडे गाऊन सविनय कायदेभंग करणाऱ्या शाहीर हेमंतराजे मावळे यांना पुण्यात अटक करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई केली गेली. ज्यामध्ये पोवाडे कार्यक्रम करू नये याचाही समावेश करण्यात आला आहे. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारे पोवाडेचे कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारला पाठविले होते.
मात्र या पत्राला सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. याचाच निषेध करत पुण्यातील लाल महाल येथे सविनय कायदेभंग करत पोवाडे सादर करणाऱ्या शाहीर हेमंतराज यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. यांनतर बोलताना शाहीर हेमंतराजे म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही पोवाड्याची परंपरा चालत आली आहे.आणि आज जर अशा सांस्कृतिक परंपरा सांगणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली तर पोवाडा कायमचा संपून जाईल. पोवाड्यांवर बंदी घालणे म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात राज्यात मोगलाई आली आहे का?’ असा सवाल देखील त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘शिवजयंतीला पोवाडा नसणे म्हणजे आत्म्या शिवाय शरीर असं आहे. मात्र, पोवाडे गायले म्हणून आम्हाला अटक करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या आणि छत्रपतींना आपलं दैवत मानणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. मात्र आता त्यांच्या मुलाकडे सत्ता असताना राज्यात छत्रपतींच्या जयंतीदिनी उत्सवाला मनाई करणं अत्यंत दुर्दैवी आणि कर्मदरिद्रीपणाचे आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री गंभीर गुन्हे करून बाहेर फिरत आहेत मात्र माझ्यासारख्या व्यक्तीला पोवाडे गायले म्हणून अटक होते. या गोष्टीचा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने निषेध करावा आणि मुख्यमंत्र्यांना जागं करावं,’ असं आव्हान देखील शाहीर हेमंतराज मावळे यांनी केलं आहे. यासंदर्भात दैनिक मुंबई तरुण भारत ने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- परभणीमध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांना १० हजार ८०० रुपयांचा दंड
- छत्रपती शिवाजी महाराजांना राज ठाकरेंची खास शैलीत शिववंदना !
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
- एका माळेचे मणी : नेतेच कोरोनाचे नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी तरी ते का पाळावेत?
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

