मुंबई – शेतकरी आंदोलन हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न असून बाहेरील लोकांनी यावर ढवळाढवळ करू नये. आमच्या देशाचे प्रश्न सोडवण्यात सरकार समर्थ आहे, अशा आशयाचे ट्विट भारतीय सेलेब्रिटी आणि खेळाडूंकडून करण्यात आले होते.आता शेतकरी आंदोलनावरून अनेक सेलिब्रेटींनी केलेल्या ट्विट्सची चौकशी करण्याचे आदेश, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.देशाबाहेरील कलाकारांनी या आंदोलनावर भाष्य केल्यानंतर भारतातील सेलिब्रिटींच्या एका गटाने देशातील एकोपा जपणं महत्वाचं असल्याचं म्हणत बाहेरच्या सेलिब्रिटींनी यात नाक खुपसू नये अशी समज दिली होती.
दरम्यान, हे ट्विट भीतीच्या छायेत केले असून यासंबधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्र्यांकडे केली. सावंत यांनी वर्चुअल पद्धतीने गृहमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी ट्विट्सची चौकशी करण्यात येईल, अशी आश्वासन त्यांनी दिले.भारतरत्न सचिन तेंडुलकर,लता मंगेशकर, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेते अक्षय कुमार, अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांचा समावेश आहे. मात्र, हे ट्विट सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी भाजप सरकारच्या दबावापोटी केले असल्याचा संशय सचिन सावंत यांनी व्यक्त केला आहे.
गृहमंत्र्यांच्या या भूमिकेचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला आहे. ‘भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे’. अशा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
तर दुसऱ्या बाजूला ‘भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत.पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे’, असे ट्वीट करून अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटीं तपासणी प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, ज्या दिग्गज सेलिब्रिटींनी हे ट्विटस केले त्यांच्यावर खरंच कुणी दबाव टाकू शकेल का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.ज्यांनी कुणी दबाव टाकल्याचा आरोप सावंत करत आहेत त्या लोकांसोबत विदेशातील सेलिब्रिटींना खडेबोल सुनावणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची पण चौकशी आता महाराष्ट्र सरकार करणार आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. जर या सेलिब्रिटींची चौकशी होणार असेल तर कृषी कायद्यांच्या विरोधात ज्या सेलिब्रिटींनी ट्विटस केले त्यांचीही चौकशी करण्याची हिम्मत राज्य सरकार दाखवणार का ?असा देखील सवाल उपस्थित होत आहे. भारताच्या हिताची भूमिका घेणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी होण्याही बहुदा हि पहिलीच वेळ ठरणार आहे.
या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना अशा पद्धतीची चौकशी करणे कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.जे महाविकास आघाडी सरकार करत आहे तेच जर भाजपने केले असते तर सावंत यांनी काय भूमिका घेतली असती? मजकुरातील समानता हा चौकशीचा विषय कसा बनू शकतो ? आरोप करण्याआधी सावंत यांच्याकडे तसे काही पुरावे आहेत का कि फक्त तर्कांच्या जोरावर या चौकशीची मागणी केली जात आहे याची उत्तरे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना द्यावी लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- परभणीच्या बालवैज्ञानिकांनी रचला इतिहास, तीन वर्ल्ड रेकॉर्डवर कोरले नाव
- पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी, पतीस तीन दिवसांची कोठडी
- परभणीचा पारा घसरला; तापमान 8.7 अंश सेल्सियसवर
- औरंगाबादेत उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन
- वनक्षेत्राला लागलेल्या आगीत 2 हेक्टरवरील झाडे जळून खाक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
