नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल बुधवारी केंद्र, दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी चांगलीच खरडपट्टी केली. या घटनेला २४ तास पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
बुधवारी या प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाला मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेसाठी खंडपीठाकडे सोपवण्यात आली. राष्ट्रपती भवनमधून न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी करण्यात आली.
तसेच देशाच्या राष्ट्रपतींनी देशाच्या सरन्यायाधिशांशी चर्चा करुन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. एस. मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरिणाया उच्च न्यायलयात केल्याचे या आदेशात म्हटलं आहे. न्या. एस. मुरलीधर यांनी तातडीने पदभार स्वीकारावा असंही यामध्ये म्हटलं आहे. दिल्लीतील हिंसाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली.
दरम्यान, दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना बुधवारी रात्री केंद्र सरकारने जाहीर केली. महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या बदलीची शिफारस केली होती, परंतु दोन आठवड्यानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

