Share

चाय पे चर्चा पुणेकर पितात तब्बल साडेपाच हजारहून जास्त किलो चहा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : नुसत्या नावाच्या उच्चारानेच आपल्याला तरतरीत करणारं पेय म्हणजे चहा. भारतीयांचीच नव्हे तर जगभरातील अनेकांची सकाळ चहाच्या वाफाळत्या पेल्याशिवाय अशक्य आहे. चहाशिवाय सकाळ म्हणजे धुके दाटलेले उदास उदास किंवा सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अशीच भावावस्था. या महात्म्यामुळेच पाण्याच्या खालोखाल लोकप्रिय ठरलेले हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पेय आहे.

चहाचं मूळ तिथे चीनमध्ये आहे. या चिनी भाषेत ‘ते’ किंवा ‘टे’ हा उच्चार कडू वनस्पतींकरता केला जायचा. त्याच ‘टे’चं ‘टी’ झालं, तर जपानी व कोरियन भाषेत ‘चा’ हा शब्द असल्याने त्याचा वापर करत भारतीय भाषेत चहा, चाय असं रूपांतर झालं. दोन्ही शब्दांचं मूळ चिनी भाषेतच आहे. चहा जसा जगभर पसरत गेला तसंतशी विविध नावं त्याने धारण केली. हे झालं चहाच्या नामकरणाविषयी.

चीनमध्ये अनेक वर्षांपूर्वी जेव्हा शेनाँग राजा राज्य करीत होता तेव्हाची ही गोष्ट. हे राजेसाहेब औषधी वनस्पतींमधले तज्ज्ञ होते आणि एके दिवशी आपल्या उद्यानात गरम पाणी पीत बसले होते. अचानक वाऱ्याच्या मंद झुळकीसोबत चहाची काही पाने त्या गरम पाण्याच्या तबकात येऊन पडली. पाहता पाहता पाण्याचा रंग बदलला. कुतूहल म्हणून राजा शेनाँग ते पाणी प्यायले आणि त्यांना तरतरीत वाटू लागले. अशाप्रकारे साऱ्या जगाला या अमृततुल्य पेयाचा शोध लागला. अर्थात आज ज्या प्रकारे आपण चहाचं सेवन करतो त्या पद्धतीने सुरुवातीला चहा प्यायला जात नसे. औषधी पेय म्हणूनच त्याचं सेवन होई. असंही म्हणतात की, या शेनाँग राजाला औषधी वनस्पतीच्या अभ्यासाचा छंद होता. त्यामुळे वनस्पतींमधले औषधीगुण तपासण्याकरता काही पानं, मुळं त्याला चावून खावी लागत. त्यातली काही विषारीही असत. या विषारी पाना-मुळांवर उतारा म्हणून तो चहाची पानं चावून खात असे आणि त्यामुळे विषाची मात्रा कमी होई.

आपल्या आठवणीतला इराणी हॉटेलातला चहा, उडपी हॉटेलातला ‘तम्बी’च्या हातचा दुधाळ चहा, टपरीवर मिळणारा काचेच्या पेल्यातील ‘दमदार’ चहा, भाजी मंडईत मिळणारा पो-याने आणलेला, कष्टाच्या गंधाचा अल्युमिनिअमच्या किटलीतला चहा, चहाचा मसाला घालून बनवलेला राजस्थानी तिखटसर चहा, लडाखचा लोणी मिसळून बनवलेला गुडगुड चहा, शिष्टाचार सांभाळत येणारा अतिशय सुबक कपबशीमधला सौम्य इंग्लिश हाय टी, सध्या चच्रेत असलेले ग्रीन टी, आइस टी असे अनेक प्रकार आपापली वेगळी रंगत राखून आहेत. आजकाल तरुण पिढी मनं जुळवण्यासाठी जरी ‘सीसीडी’तल्या कॉफीला पसंती देत असली तरी त्यासाठी पूर्वापार चालत आलेला चहा-पोंचा कार्यक्रम जास्त योग्य वाटतो. चहाचे प्रयोजनच मुळात मनं जुळविण्यासाठी, जोडण्यासाठी केलेले दिसते. उष्टय़ा चहाच्या कपाची देवाणघेवाणही नातेसंबंध दृढ करायला मदत करतात. कोकणात आपल्या घरी कुणी पाहुणा आला तर त्याला प्यायला पाणी देता देताच चहाचे आधण ठेवले जाते. तेवढय़ा वेळात त्याची, त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली जाते. अगत्याने देऊ केलेल्या त्या घोटभर चहात पोटभर आनंद सामावलेला असतो. अनेकदा तिथली सकाळ ‘काय शेजारी? चहा झाला का?’च्या गजरानेच सुरू होते.

चहा घ्यावा, चहा द्यावा, चहा जिवीचा विसावा

लहानांना, थोरांना, काळ्यांना, गो-यांना

सा-यांनी, सा-यांना, चहा द्यावा, चहा घ्यावा

चहा हा असा पेयप्रकार की, जो तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या स्वागताला हजर असतो आणि त्याला नकार देणं अवघड. गरमागरम वाफाळता चहा पिणं ही वेगळीच अनुभूती असते. सुखाच्या प्रसंगांची रंगत वाढवणारा आणि दु:खाच्या प्रसंगी काळजी घेणारा, आळसाला चुटकीसरशी दूर पळवून लावणारा चहा प्यायलाच हवा. सुखाच्या प्रसंगांची रंगत वाढवणारा आणि दु:खाच्या प्रसंगी काळजी घेणारा, आळसाला चुटकीसरशी दूर पळवून लावणारा चहा सुर्र्र के पियो..

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!