मुंबई : महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत 14, तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 74 वरुन 89 वर पोहोचला आहे.
तसेच रविवारी राज्यात 10 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी पुणे येथील 4, मुंबईचे 5 तर नवी मुंबई येथील 1 रुग्ण आहेत. राज्यातील बाधितांची संख्या आता 74 झाली होती. आता ती संख्या वाढून 89वर गेली आहे. एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला.
याचप्रमाणे ‘रुग्णसंख्या वाढली आहे मात्र लोकांनी काळजी करु नये. शक्यतो घरी रहावं, घराबाहेर पडू नये. स्वयंशिस्त पाळावी अशी विनंती आणि आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. रविवारचा पूर्ण दिवस भारताने जनता कर्फ्यूचं पालन केलं. मात्र लोकल ट्रेन बंद असल्याने सोमवारच्या दिवशी खासगी वाहनांनी मुंबईत जाण्यासाठी गर्दी होते आहे. ही गर्दी करणं चुकीचं आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सगळ्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

