येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीची अवघ्या महिन्यावर आलेली चैत्र पौर्णिमा यात्रा कोरोना व्हायसरच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय बुधवारी (ता. ११) झालेल्या प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला आहे.
लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या येथील येडेश्वरी देवीची यात्रा यंदा नऊ ते २३ एप्रिल दरम्यान होणार होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय येथील विठ्ठल -रुक्माई मंदिराच्या आनंदधाम येथे बुधवारी आयोजित प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला आहे.
यात यात्रा काळात होणारे सर्व धार्मिक विधीसह यात्रेतील मुख्य चुन वेचण्याचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. ही बैठक उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कळंबच्या तहसीलदार मंजुषा लटपटे, सरपंच विकास बारकुल,वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर बिराजदार, सहायक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, देवस्थान ट्रस्टचे सदस्य, मानकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या कोरोना व्हायरसने जगातील अनेक देशात थैमान घातले असून, यामुळे या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बहुसंख्येने लोक जमतील असे धार्मिक कार्यक्रम, विधी, यात्रा महोत्सव प्रशासनाने बंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. यात येणाऱ्या एप्रिलमहिन्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा म्हणून गणली जाणारी येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची नऊ ते १३ एप्रिल दरम्यान होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी येरमाळा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये देवीची पालखी आमराई मंदिरात दाखल होण्याच्या दिवशीचा मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रमही सवानुमते रद्द करण्याचा निर्णय बैठकीत झालेल्या चर्चेतून घेण्यात आला.
याशिवाय यात्रेत दाखल ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणारे व्यवसाय परवानेही देण्यात येणार नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून गावात विविध आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून दर दोन ते आठ दिवसांला निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्याचे आदेशही आरोग्य विभागाला उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिले आहेत.
यात्रेनिमित्त दरवर्षी राज्यभरातून सुमारे आठ ते नऊ लाख भाविक यात्रेच्या मुख्य चुन वेचण्याचा कार्यक्रमासाठी दाखल होत असतात. पाच दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी परिसरातील तसेच राज्याच्या विविध भागांतून, परराज्यातून असंख्य व्यावसायिक यात्रा काळात व्यवसायासाठी दाखल होत असतात. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल यात्रा काळात होत असते. या यात्रेसाठी माल खरेदीची तयारी व्यावसायिक महिनाभरपासूनच करत असतात. मात्र सध्या राज्यातील यात्रा कोरोना व्हायरसमुळे रद्द होते की काय याकडे व्यावसायिकांचेही लक्ष लागले होते.
कोरोना व्हायरसने जगाला ग्रासले आहे, त्या अनुषंगाने येडेश्वरी देवीची यात्रा रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्थानिकांचा सहभाग म्हणजे आदर्श ठरेल असेच स्थानिक लोकांसारखे सहकार्य इतरांनीही आपल्या नातेवाईकांना सांगून करावे करावे. यात्रा काळात पुरवल्या जाणाऱ्या कोणत्याच प्रशासकीय सुविधा दिल्या जाणार नाहीत, यात्रा स्पेशल बस सुद्धा नाही. – अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

