बीड : जिल्ह्यातील नेहमी अडचणीत असलेला शेतकरी दोन वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे. सरकार दरबारी वारंवार खेटे मारूनही विमा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १ जूनला जिल्ह्यातील ११ गावांतील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर एक महिला शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती भाई गंगाभीषण थावरे यांनी दिली.
गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरला. मात्र, विमा कंपनीने केवळ १३ कोटी विमा वाटप केला. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १०७ गावांत सोयाबीन, तूर, कापसाचे मोठे नुकसान झाले. शासनाने या सर्व १०७ गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. परंतु, विमा कंपनी विमा द्यायला का टाळाटाळ करत असल्याचे थावरेंचे म्हणणे आहे. विमा कंपनीने विमा न दिल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे थावरे यांनी म्हटले आहे.
माजलगाव तालुक्यातील आनंदगाव, खरात आडगाव, बीड तालुक्यातील मौज, शिरूरमधील तिंतरवणी, पाटोद्यातील भायाळा, केजमधील वरपगाव, अंबाजोगाईतील पूस, परळीतील पोहनेर, वडवणीतील कोटरबन, धारूरमधील कान्नापूर व केज तालुक्यातील वरपगाव येथील ग्रामपंचायतींच्या कार्यालयासमोर एक महिला शेतकरी आंदोलन करणार आहे. याच दिवशी भाई थावरे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.
कोरोनामुळे मोठे आंदोलन न करता ११ गावांतील ग्रामपंचायत कार्यालयांसमोर अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गायकवाड अहवाल हा उद्धव ठाकरेंना समजलाच नाही’, संभाजी पाटील निलंगेकर यांची टीका
- दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाचा निषेध, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- ‘तुटवडा असताना खासगी रुग्णालयांना लस कशी मिळते?’, ‘आप’चा केंद्राला सवाल
- ‘पश्चिम बंगालसाठी मोदींच्या पायाही पडले असते, पण अपमान असह्य’, ममता बॅनर्जींचा पुन्हा घणाघात
- अर्जुन आता मलायकाचा शेजारी ; घेतला ‘इतक्या’ कोटींचा फ्लॅट


