Share

‘भाजप राजकारणात कोणती संस्कृती रुजवू पाहत आहे ?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी व आमदरांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. तर, डाव्या पक्षांनी काँग्रेसला सोबत घेत ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटले आहे. अशावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर राज्यातील आपले वर्चस्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

बंगालमध्ये ममता यांच्या तृणमूलला गळती लागली असून, अनेक जण पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत आहेत. पश्चिम बंगालमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी,आमदार अरिंदम भट्टाचार्य,सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान तृणमूल खासदार महुआ मोइत्रा या मात्र ममतांच्या बाजूने खिंड लढवणाऱ्या ठरत आहेत. याच मोइत्रा यांनी संसदेत ”पाळत ठेवावी असे आपण काय केले आहे?” असा प्रश्न विचारला आहे. यावरून शिवसेनेने भाजप वर निशाणा साधला आहे.

‘तृणमूल काँग्रेसच्या झुंजार खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. ”पाळत ठेवावी असे आपण काय केले आहे?” असा प्रश्न श्रीमती महुआ यांनी विचारला आहे. महुआ या लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. त्या प. बंगालातून प्रथमच निवडून आल्या, पण एखाद्या अनुभवी खासदारास मागे टाकतील अशी संसदीय झुंज त्या लोकसभेत देत आहेत. प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना ‘बंगालची वाघीण’ असे म्हटले जाते. संपूर्ण केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्यासाठी प. बंगालात उतरले आहे.

सुश्री ममता यांची नजीकची माणसे फोडून कोलकात्यात भाजप आपली घरभरणी करीत असला तरी ममता बॅनर्जी परिस्थितीशी बेडरपणे टक्कर देत आहेत. अशा वाघिणीला साजेशी सहकारी म्हणून आम्ही महुआकडे पाहतो. लोकसभेत व वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत या झुंजार वाघिणीने मोदी सरकारला अनेकदा घाम फोडला आहे. त्यामुळेच तिला वेसण घालण्यासाठी नको असलेली सुरक्षा व्यवस्था देऊन पाळत ठेवली जात आहे. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत देशाच्या न्यायव्यवस्थेचा बुरखा फाडणारे भाषण केले. महुआ यांनी काय सांगितले? न्यायव्यवस्था आता पवित्र नाही (काल न्या. रंजन गोगोई यांनीही नेमके तेच सांगितले).

केंद्र सरकार म्हणजे अफवा, चुकीची माहिती पसरविणारा फुटीर उद्योग झाला आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला करताना सांगितले, ”काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि खोटेपणास शौर्य मानतात.” यावर भाजप जाम भडकला आहे. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राममंदिरासंदर्भात निकाल दिल्याचा आरोप महुआ यांनी केला. महुआ यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जोरदार भाषण झाले व अर्थव्यवस्थेपासून कृषी कायद्यांपर्यंत अनेक मुद्दय़ांवर त्यांनी सरकारची बोलती बंद केली,

पण सरकारची बोलती बंद झाली तरी त्यांच्या हाती पोलीस, सीबीआय, गुप्तचर व्यवस्था आहे व त्यांचा वापर करून राजकीय विरोधकांवर पाळत ठेवली जात आहे वा ‘ईडी’चा फटका मारून घायाळ केले जात आहे. हा विषय एकटय़ा महुआपुरता मर्यादित नाही. विरोधी पक्षांतील इतर अनेकांना नामोहरम करण्यासाठी याच तंत्राचा वापर केला जात आहे. अनेकांचे फोन रेकाॅर्ड केले जात आहेत, ई-मेल्स चोरून वाचले जात आहेत. हे फक्त विरोधी पक्षांपुरतेच मर्यादित नाही. सत्ताधारी पक्षातील प्रमुख लोक, मंत्री, त्यांच्या कुटुंबांवर एक प्रकारचे दडपण आहे. राजकीय वातावरणातला खुलेपणा संपला आहे. देशाच्या राजधानीचे वातावरण गुदमरल्यासारखे झाले आहे.

सरकार पक्षातील अनेकांनाही महुआप्रमाणेच भीती वाटत आहे. कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे, फोन ऐकले जात आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोक संसद काळात विरोधी पक्षांच्या खासदारांशी बोलायला घाबरतात. कुणी पाहिले तर राजकीय किंमत चुकवावी लागेल असे त्यांना वाटते. सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदारही एका सन्नाटय़ात जगत आहेत. सामाजिक, राजकीय वातावरणात एक प्रकारची मूकबधिरता आली आहे व महुआ यांनी त्याच गुदमरलेल्या वातावरणाचा स्फोट केला आहे. महुआ यांनी स्पष्ट केले आहे की, ”मी बेडर आहे. सर्व संकटांशी सामना करण्यास सक्षम आहे. मी कधीही पोलीस सुरक्षा मागितलेली नाही, तरीही माझ्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी अचानक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले.

माझ्यावर पाळत ठेवण्यासाठीच हे सर्व सुरू आहे.” सीमा सुरक्षा दलाचे तीन जवान महुआ मोईत्रा यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आले. ”देशाच्या नागरिकांना स्वतःचे खासगीपण जपण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असून तो मला जपायचा आहे,” असे महुआ यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना कळवले आहे. महुआ यांना अशा प्रकारे जेरबंद करून वाघिणीचे गुरगुरणे व गर्जना थांबणार आहे काय? राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा घणाघात महुआने केला. प. बंगालची स्थिती भाजपने चिंताग्रस्त केली आहे. काही करून प. बंगाल जिंकायचेच असा विडा या मंडळींनी उचलला आहे व त्यासाठी संपूर्ण तृणमूल काँग्रेसला फोडण्याची योजना दिसत आहे.

आता ताजे उदाहरण राज्यसभेचे खासदार दिनेश त्रिवेदी यांचे आहे. तृणमूलने त्यांना अनेकदा लोकसभा, राज्यसभेत पाठवले. केंद्रात मंत्री केले, पण आता त्रिवेदी यांना अचानक गुदमरल्यासारखे वाटू लागले व ते प्राणवायूच्या शोधात भाजपमध्ये गेले. हे सर्व चमत्कारिक आहे. भाजप राजकारणात कोणती संस्कृती रुजवू पाहत आहे? या देशात आमच्याशिवाय दुसरा कोणीच राहता कामा नये याच मार्गाने ते प्रवास करीत असतील तर त्यांना हा देश व जनतेचे मानस नीट समजलेले दिसत नाही.

आजही अशा कठीण परिस्थितीशी बेडरपणे ‘सामना’ करणारे लोक आहेत. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, पंजाबचे बादल, शेतकऱयांचे नेते राकेश टिकैत असे अनेक लोक बेडर होऊन संघर्ष करीत आहेत. सरकारकडे पाळत ठेवण्याची यंत्रणा असल्याने ‘सामना’ थांबणारा नाही. महुआ यांच्यावर पाळत ठेवून सरकारने स्वतःची दुर्बलता उघड केली. एका महिलेला सरकार घाबरले हेच आता स्पष्ट झाले आहे. हुकूमशाही ही सगळ्यात जास्त डरपोक असते हे पुन्हा सिद्ध झाले. महुआ मोईत्रा यांनी त्यांचा बुरखा फाडला आहे. अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!