मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भातील सहकारच्या बिलाबाबत विधानपरिषदेत चर्चा झाली. यावेळी हे बिल शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे मत मांडत ज्या शेतकऱ्यांच्या शेतीउत्पादनांच्या विक्रीसाठी निर्मिलेल्या बाजार समितीत शेतकऱ्यांना मताधिकार नाकारणारे बिल मंजूर होत असताना एक शेतकरीपुत्र म्हणून या बिलाचा नक्कीच विरोध करेल असे आ विनायक मेटे म्हणाले. यावेळी त्यांनी आघाडीच्या प्रस्थापित पद्धतीच्या राजकारणचा खरपूस समाचार घेत शिवसेना शेतकरी हित विसरत चालली असल्याचे त्यांनी दर्शवून दिले.
विधान परिषदेत ते बिलावरील चर्चेदरम्यान म्हणाले कि, ‘कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्थापितांचे प्रस्थ वाढवणारे हे बिल थेटपणे दिसून येते आहे. शिवसेनाप्रमुख आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अपेक्षित असलेला कसलाही व्यवहार सध्या शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री करत नाहीत. या बिलाच्या माध्यमातून प्रस्थापितांना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसवण्याचे काम केले जाणार आहे. आधीच ग्रामपंचायती व नगरपरिषदांमध्ये थेट जनतेतील निवडी रद्द करून काहींनी प्रस्थापित राजकीय प्रवाह पक्का करून घेतला आहे’.
विधानपरिषद कामकाज संपण्याच्या वेळी या बिलाबाबत चर्चा करत असताना याचा आ मेटे यांनी कडाडून विरोध करत शेतकऱ्यांना मताधिकार असावा अशी मागणी लाऊन धरली. ‘उर्वरित चर्चा सोमवारी दुपारी करण्यात येणार असून शेतकऱ्यांचा मताधिकार व बाजार समित्यांच्या शेतकरी लुटारू धोरणाचा कडाडून विरोध नक्की करेल’ असेही ते कामकाज संपण्याच्यावेळी म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

