🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा-बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७५ वा वाढदिवस. बॉलिवूडचे शहेनशहा आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण परिवारासोबत मालदीवला गेले आहेत. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. पण त्यानंतर ते बदलून अमिताभ ठेवण्यात आले. अमिताभ म्हणजे असा प्रकाश जो कधीही कमी होत नाही.

हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्ममध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले. अमिताभ बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली.

करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात अमिताभ यांना संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी मदत केली होती.मुंबईत जेव्हा बिग बींकडे राहायला घर नव्हते, तेव्हा त्यांनी अनेक रात्री मरीन ड्राइव्ह बीचवर काढल्या होत्या.

अमिताभ यांनी ‘सात हिंदुस्तानी’ (1969) या सिनेमाद्वारे अभिनय करिअरला सुरुवात केली होती.या सिनेमासाठी त्यांना 1000 रुपये मानधन मिळाले होते. हीरो म्हणून ‘जंजीर’ हा बिग बींचा पहिला हिट सिनेमा होता. 1973 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. यापूर्वी त्यांचे तब्बल 12 सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यांचे फेव्हरेट स्क्रिन नेम ‘विजय’ हे आहे. वीसहून अधिक सिनेमांमध्ये त्यांचे नाव विजय होते. दुसरे लोकप्रिय नाव ‘अमित’ होते. अमिताभ एकमेव असे अभिनेते आहेत, ज्यांनी सिनेमात सर्वात जास्त दुहेरी भूमिका आहेत. (डॉन, कसमें-वादे, सूर्यवंशम, बडे मियां-छोटे मियां, लाल बादशाह). ‘महान’ या सिनेमात त्यांनी तिहेरी भूमिका साकारली होती.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सर्वाधिक नामांकन मिळवण्याचा रेकॉर्ड अमिताभ यांच्या नावी आहे. शशी कपूर यांच्या उत्सव आणि जॅकी श्रॉफ यांच्या ‘किंग अंकल’ या सिनेमांसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंती अमिताभ बच्चन यांना होती. अमिताभ एकमेव असे अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्याच सिनेमाच्या रिमेकमध्ये काम केले आहे. 1975 मध्ये रिलीज झालेल्या ‘शोले’ या सिनेमाचा रिमेक असलेला आणि 2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘राम गोपाल वर्मा की आग’मध्ये बिग बींनी काम केले होते. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची ‘अनटोल्ड लव्ह स्टोरी’ कमालीची गाजली. ‘दो अंजाने’या चित्रपटाच्या सेटवर रेखा आणि अमिताभच्या प्रेमाचा अंकुर बहरला. या चित्रपटानंतर रेखाची इमेज पूर्णपणे बदलली, तिच्या करिअरमधील हा चित्रपट टर्निंग पॉर्इंग असल्याचे बोलले जाते.
रेखा आणि अमिताभ नेहमी सिक्रेटली रेखाच्या एका मैत्रिणीच्या बंगल्यात भेटायचे. परंतु एके दिवशी अमिताभ यांचा संयम सुटला आणि त्यांनी ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटाच्या सेटवर रेखाच्या सहकलाकाराशी तिच्या वरुन भांडण केले. यानंतर अमिताभ व रेखा यांच्या अफेअर्सची चर्चा सर्वत्र झाली. ऋषी कपूर आणि नितू सिंगच्या लग्नामध्ये रेखा भांगात कुंकू भरून आणि गळ्यात मंगळसूत्र घालून गेली होती. त्यावेळी सर्वांचेच लक्ष तिने वेधून घेतले. अमिताभ-रेखाने गपचूप लग्न केल्याची चर्चा यावेळी रंगली होती

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

