टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून कोकणात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली आहे. यासंधार्भात या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
तसेच या दुर्घटनेत १८ बळी गेलेल्या निष्पाप गावकऱ्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये सांत्वनपर निधी देऊन या गावकऱ्यांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे अशी मागणी केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आठवले भेट घेणार आहेत.
तिवरे धरणफुटी बाबत चा धोका स्थानिक गावकऱ्यांनी प्रशासनाला कळविला होता. धरणामध्ये भगदाड पडले असून धरणाला धोका असल्याची तक्रार फेब्रुवारी मध्येच प्रशासनाला कळविण्यात आली होती असा दावा स्थानिक करीत आहेत. या तक्रारीबाबत ज्या अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केले त्यांची आणि एकूण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे.
धरणफुटीमुळे परिसरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी अशी सूचना करून तीवरे धरणफुटी दुर्घटनेत १८ बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांतील वारसांना शासनाने रोजगार देऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

