मुंबई : दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देखील हे आंदोलन सुरु असून आज शेतकऱ्यांनी दिल्लीतील सीमांमधून आत येऊन ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.
या आंदोलनासाठी पोलिसांनी मार्ग आखून देऊन मर्यादित परवानगी दिली होती. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाला वेळ देण्यात आली होती. याआधीच हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला तीन सीमांमधून दिल्लीत प्रवेश करून हा ट्रॅक्टर मोर्चा पुढे चाललेला होता. मात्र शेतकरी अधिक आक्रमक झाले व हा जत्था लाल किल्याकडे जात असताना पोलीस व आंदोलक भिडल्याचं दिसून आलं.
राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी देखील प्रतिक्रिया देताना या हिंसाचाराचं खापर मोदी सरकारवर फोडलं आहे. ‘शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सुमारे १२ हुन अधिक चर्चेच्या फेऱ्या झाल्या मात्र समस्या सुटली नाही. दोन महिन्यांहून अधिक काळ हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यामुळे त्यांचा आता संयमाचा बांध फुटला आहे. आता मोदी सरकारची दादागिरी, मस्ती खपवून घेणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. शेतकऱ्याच्या विरोधात जर गेलात तर तुम्हाला नेस्तनाबुत केल्याशिवाय राहणार नाही,’ असा आक्रमक इशारा देखील बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
दरम्यान, हे आंदोलन आता शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी लाल किल्ला देखील काबीज केल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलकांनी दगडफेक केली, ट्रॅक्टर पोलिसांवर चढवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आखून दिलेला मार्ग सोडून हे आंदोलक इतर भागात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस अश्रूधूर, लाठीचार्ज करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्य
- हिंसाचाराने ही समस्या सुटणार नाही, नुकसान देशाचंच होईल; राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आवाहन
- शेतकरी आंदोलन : हिंसा करणारे आमचे आंदोलक नाहीत – शेतकरी नेते योगेंद्र यादव
- शेतकरी आंदोलन चिघळले; पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकर्त्यांनी उपसल्या तलवारी!
- ‘शेतकरी मोर्चाला पब्लिसिटी स्टंट म्हणत शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आठवलेंनी माफी मागावी’
- प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघणे, हे फार दुर्दैवी आहे; मुश्रीफांची केंद्र सरकारवर टीका


