औरंगाबाद : सध्याच्या डिजिटल युगात मोबाइल आणि इंटरनेट दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामूळे इंटरनेट शिवाय जगणे म्हणजे तुमचा जगाशी संपर्क तुटतो त्याचबरोबर व्यवहार देखील ठप्प होतात. डिजिटल इंडियाच्या नावाखाली सर्वत्र ऑनलाइन व्यवहार होत आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात इंटरनेट राहीले दूर, पण अद्याप मोबाइलला नेटवर्कच येत नाही. या प्रकारामुळे त्रस्त गावकऱ्यांनी आता गावच विकायला काढले आहे. तसा फलकच गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर लावला. खुलताबाद तालुक्यातील ‘भडजी’ असे विक्रीला काढलेल्या गावाचे नाव आहे.
देश आता डिजिटल होत आहे. पैशांच्या देवाणघेवाणीपासून ते शिक्षणापर्यंत सर्वच ऑनलाइन झाले आहे. मात्र, खुलताबाद – फुलंब्री रस्त्यावर असलेल्या भडजी या गावात फोनला नेटवर्कच नसल्याने कोणाशीही संपर्क होत नाही. या गावाची लोकसंख्या 2 हजार 800 आहे. मोबाइल क्रांती होऊन बरीच वर्षे लोटली आहेत. आता 5G प्रणाली लवकरच ग्राहकांच्या सेवेत आणण्यासाठी वेगाने काम होत आहे. या सर्व क्रांतीपासून हे गाव आणि गावकरी आहे अद्याप कोसो दूर आहे. टेलिकॉम कंपन्यांना अर्ज करूनही अद्याप कोणतीही कंपनी या गावाला सेवा देऊ शकली नाही, त्यामुळेच गाव विक्रीला काढल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
भडजी गावात नेटवर्क नसल्याने खिशात मोबाइल आहे मात्र, त्याचा उपयोग ना कोणाशी संभाषण करण्यासाठी होतो, ना ऑनलाइन काम करण्यासाठी! कोणाशी संवाद साधायचा असेल तर, उंच ठिकाणी, घराच्या छतावर अथवा महामार्गावर जावे लागते. घराच्या आत मोबाइल नेटवर्क नसल्याने किमान फोन तरी यावा, यासाठी बहुतांश लोकांनी आपल्या दरवाजाबाहेरच मोबाइल ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. कोणी स्टँड तयार केले आहे तर, कोणी फळी लावली आहे. कधी-कधी तर मोबाइल घेऊन नेटवर्कच्या शोधात आसपासच्या परिसरात फिरावे लागते
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र, भडजी गावात नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. घरात नेटवर्क नसल्याने विद्यार्थी मोबाइल घेऊन अंगणात बसतात. गावात काही ठराविक ठिकाणीच कसे-बसे 2G किंवा 3G नेटवर्क मिळते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण कसे घ्यावे? असा प्रश्न गावातील पालक आणि विद्यार्थ्यांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
- ‘मी पवारांना भेटून राज्यपालांना मार्गदर्शन करायला सांगणार आहे’
- नाशिकमधील बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झाले सुरु
- ‘माझ्या सहकाऱ्यांनो,सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू,दडपशाहीचा धिक्कार करू’
- आरोग्य सेतू ॲप कुणी बनवलं ? इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केला खुलासा


