🕒 1 min read
मुंबई : संपूर्ण जगामध्ये वाऱ्यासारखा पसरलेला हा कोरोना विषाणू सध्या भारतामध्ये थैमान माजवत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने हा विषाणू जास्त पसरू नये म्हणून अनेक खबरदाऱ्या घेतल्या आहेत. अनके प्रकारचे कार्यक्रम,सोहळे, आणि अनेक गर्दी होणारे सगळेच उत्सव यामुळे जवळपास रद्ध करण्यात येणार आहेत.
याचा परिणाम क्रीडा विश्वावरही जाणवत आहे. जगभरात होणाऱ्या विविध स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्या प्रेक्षकांविना खेळवल्या जात आहेत. इंडियन प्रीमिअर लीगचा १३ वा मोसमही होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. श्रीलंका, इंग्लंड आणि भारतातील आंतरराष्ट्रीय मालिका रद्द करण्यात आल्या. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला वन डे सामना बंद दरवाजात झाला. त्यानंतर स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय झाला
२९ मार्चला सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अजूनही आयपीएल होईल की नाही, हे चित्र स्पष्ट झालेले नाही. झालीच तर ती बंद दरवाजात होईल, याची शक्यता अधिक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धा रद्द झाली. या लीगमध्ये खेळणारा भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं प्रेक्षकांविना क्रिकेट या संकल्पनेवर नाराजी प्रकट केली. पण, त्याचवेळी त्यानं कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी लोकांना गर्दीपासून दूर ठेवणेच योग्य असल्याचेही कबुल केले.
तो म्हणाला, मी केवळ स्थानिक क्रिकेट रिकाम्या स्टेडियममध्ये खेळलो आहे. त्यानंतर आतापर्यंत म्हणजे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजपर्यंत प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये मी खेळलो. प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यात मजा नाही. तुम्ही चौकार-षटकार लगावल्यावर कोणी टाळ्या वाजवणारं नसेल, कोहली… कोहली किंवा धोनी… धोनी असा गजर नसेल, सर्व निरस वाटेल. पण, सद्यस्थिती पाहता लोकांना स्टेडियमवर प्रवेश न देणंच महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असली, तर अशा वेळी त्याचा प्रसार अधिक वेगानं होण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
