पुणे : कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पाच असून मुंबईत कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच गेल्या काही दिवसात जे नागरिक परदेशी जाऊन आले आहेत त्यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यांच्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत. तसेच कोरोनाबाबत पाच सदस्यीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे एकट्या सार्वजनिक आरोग्य खात्यावर ताण येऊ नये म्हणून गृह खातं, महसूल, वैद्यकीय, शिक्षण खात्याचे अधिकारी एकत्र काम करतील, असं टोपे यांनी सांगितलं.
पुण्यात कोरोनाग्रस्त दांपत्य आणि त्यांच्या कुटुंबाने गेल्या दहा दिवसात ज्यांच्या संपर्कात आले त्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत. यासाठी एक टीम काम करत आहे. शासनाच्यावतीने सर्व यंत्रणा सज्ज असून आरोग्यासंबधीची सर्व उपकरणे उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरु आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी वेगळे वॉर्डही तयार केले जात आहेत. तसेच कोरोनाबाबत जनजागृतीचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलंं आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
याशिवाय जगभरातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता कोरोनाबाबत अनेक अफवा सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसवल्या जात आहेत. या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवून घाबरून जाऊ नका, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

