टीम महाराष्ट्र देशा : चार दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. मुंबईसह राज्यात पडणाऱ्या पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पावसामुळे मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली आहे. याचा फटका ७ गावांना बसला असून यामध्ये आतापर्यंत २५ जण बेपत्ता झाले आहेत. तर आतापर्यंत नऊ जणांचे मृतदेह हाती आले आहेत.
एका बाजूला तिवरे धरण फुटल्याने महाराष्ट्र हादरला असताना आता धामणा धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला मोठे तडे गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे. वाढत्या पाणी साठयामुळे धामणा धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे भिंतीतूनच पाणी वाहू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तिवरे धरण फुटल्याने अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या दुर्दैवी घटनेतून बोध घेत प्रशासन धामणा धरणाच्या बाबतीत काही पावले उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

